Vastu Shastra : घराच्या बाल्कनीची सजावट करताना या गोष्टी लक्षात असू द्या, अन्यथा निर्माण होऊ शकतो वास्तुदोष
Tv9 Marathi March 08, 2026 12:45 AM

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व आहे. वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या सोबत काही वाईट गोष्टी घडत असतील तर तो केवळ तुमच्या नशीबाचा दोष नसतो, तर त्यासाठी तुमच्या घरात निर्माण झालेला वास्तुदोष देखील जबाबदार असू शकतो. अनेकदा आपण दररोज अशा काही छोट्या-छोट्या चुका करतो, त्यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा तयार होते. या नकारात्मक ऊर्जेमुळे आपण संकटात सापडू शकतो, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात ज्या काही वस्तू असतात, त्या प्रत्येक वस्तूंचा तुमच्या आयुष्यावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत असतो, त्यामुळे घराची सजावट करत असताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते, त्याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहोत.

बाल्कनीची सजावट करताना काय काळजी घ्यावी?

वास्तुशास्त्रामध्ये जसं तुमच्या घराचा मुख्य दरवाजा, हॉल, स्वयंपाक घर, बेडरूम याचं महत्त्व असतं, तेवढंच तुमच्या घराच्या बाल्कनीचं देखील महत्त्व असतं. त्यामुळे तुम्ही जेव्हा नवीन घर घेता तेव्हा बाल्कनीची दिशा कोणती आहे, ते पाहूनच घर घ्यावं. वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घराची बाल्कनी ही शक्यतो पूर्व दिशेलाच असावी. जर पूर्व दिशेला नसेल तर पश्चिम दिशेला असली तरी चालेल पण घराची बाल्कनी ही कधीही दक्षिण दिशेला असू नये, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे.

बाल्कनीची सजावट करताना तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये असे काही झाडं ठेवू शकतात, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. जसं की तुळस, शमी या सारखी झाडं तुम्ही तुमच्या बाल्कनीमध्ये लावू शकतात. तसेच फुलांची झाडं देखील लावू शकतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी शक्यतो बाल्कनीत काटेरी झाडं लावणं टाळावं, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. जर तुम्ही बाल्कनीमध्ये काटेरी झाडं लावले तर त्यामुळे घरात वास्तुदोष निर्माण होण्याची शक्यता असते, त्यामुळे घरात काहीही कारण नसताना वादव विवाद होतात, अशी मान्यता आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.