आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या दहाव्या पर्वातील (Icc T20i World Cup 2026) अंतिम सामन्याचं काउंटडाऊन सुरु झालं आहे. टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील महाअंतिम सामन्यात 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमधील 2 संघ आमनेसामने असणार आहेत. इंडिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी थेट लढत होणार आहे. रोहित शर्मा याच्या नेतृत्वात 9 मार्चला न्यूझीलंडला पराभूत करुन 23 जून 2013 नंतर टीम इंडियाने पहिल्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली होती. त्यानंतर आता दोन्ही संघ टी 20i वर्ल्ड कप फायनल निमित्ताने आमनेसामने आले आहेत. रोहित शर्मा याच्यानंतर कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादव याच्यावर भारताला सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड कप जिंकून देण्याची जबाबदारी आहे. अशात कर्णधार सूर्या आणि टीम इंडियाच्या कामगिरीवर चाहत्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडिया गतविजेता असल्याने सूर्यासेनेसमोर वर्ल्ड कप ट्रॉफी राखण्याचं आव्हान आहे. तर न्यूझीलंड सूर्यकुमार यादव याच्या टीमवर मात करुन 2025 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमधील पराभवाची परतफेडीसह पहिला टी 20i वर्ल्ड कप जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण मैदान मारतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. हा अंतिम सामना जिंकणारा संघ विश्वविजेता ठरेल. विजयी संघ मालामालही होईल. वर्ल्ड कप विजेत्या आणि उपविजेत्या संघाला बक्षिस म्हणून किती रक्कम मिळेल? हे आपण जाणून घेऊयात.
आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, टी 20i वर्ल्ड कप विजेत्या संघाला ठरल्यानुसार 3 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास साडे 27 कोटी रुपये इतकी रक्कम बक्षिस म्हणून मिळणार आहे. वर्ल्ड कप जिंकल्यास टीम इंडिया मालमाल होईल. तसेच बीसीसीआयकडूनही भारतीय संघासाठी विशेष बक्षिस म्हणून रक्कम जाहीर करण्यात येऊ शकते.
तसेच उपविजेत्या संघालाही चांगलीच रक्कम मिळणार आहे. अंतिम सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाला 14 कोटी 65 लाख रुपये बक्षिस म्हणून देण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक संघाला आयसीसीकडून प्रत्येक विजयासाठी ठराविक रक्कम देण्यात येणार आहे. तसेच सहभागी झालेल्या 20 संघांनाही आयसीसी रक्कम देणार आहे. त्यामुळे आयसीसीकडून प्रत्येक संघाला कामगिरीच्या जोरावर बक्षिस रक्कम देण्यात येणार आहे.