पतीचे निधन, २०व्या वर्षी संसाराचा गाडा हाती आला, रोज मुंबई-पुणे प्रवास; ३ मुलांसाठी झटणाऱ्या पॉईंट्समनची प्रेरणादायी कहाणी
esakal March 08, 2026 12:45 PM

नितीन बिनेकर

मुंबई : मध्यरात्रीचा काळोख, ट्रॅकवर विखुरलेले अपघाताचे अवशेष… असे दृश्य पाहून अनेकांची पावले थबकतात. मात्र त्या क्षणी एक महिला निर्धाराने पुढे सरसावली. तिने शांतपणे परिस्थिती हाताळत अपघातग्रस्ताचे अवशेष गोळा केले. मृत्यूच्या सावलीतही न डगमगणारी ही महिला म्हणजे मध्य रेल्वेतील पॉईंट्समन रूपाली सिद्धार्थ खरे.

मूळच्या पुण्याच्या असलेल्या रूपाली खरे दररोज पुणे ते मुंबई असा लांबचा प्रवास करून ड्युटी बजावतात. दिवसाचा प्रवास, रात्रभराची जबाबदारी आणि पुन्हा दुसऱ्या दिवशीचा प्रवास… असा त्यांचा संघर्षमय दिनक्रम आहे.

स्ट्रेस फ्री झोन, शांत आणि योग क्षेत्र, अर्बन फॉरेस्ट अन् बरंच काही! मुंबईत अनोखे उद्यान उभारणार; पण कुठे? वाचा संपूर्ण योजना...

गेल्या १४ वर्षांत त्यांनी अनेक कठीण प्रसंगांना धैर्याने सामोरे जात आपली जबाबदारी पार पाडली आहे. त्यांच्या या धाडसाबद्दल त्यांना विभागीय रेल्वे व्यवस्थापकांकडून (डीआरएम) सन्मानही मिळाला आहे.

- संकटानंतर उभी राहिलेली जिद्द

रूपाली खरे यांच्या आयुष्यातील संघर्षाची खरी सुरुवात पतीच्या अचानक निधनानंतर झाली. सुमारे सोळा वर्षांपूर्वी त्यांच्या पतीला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि काही क्षणांतच संसाराचा आधार हरपला. त्या वेळी घरात तीन लहान मुले, पुढील आयुष्याची जबाबदारी आणि भविष्याचा मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा होता. अचानक आलेल्या या संकटाने त्यांचे आयुष्यच बदलून गेले.

अशा कठीण काळात अनेकजण खचून जातात; मात्र रूपाली खरे यांनी परिस्थितीसमोर हार मानली नाही. रेल्वेकडून अनुकंपा तत्त्वावर नोकरीची संधी मिळाली आणि त्यांनी धैर्याने ती स्वीकारली. त्या वेळी त्यांचे वय अवघे वीस-बावीस वर्षे होते. एवढ्या कमी वयात त्यांनी आई आणि कुटुंबप्रमुख अशी दुहेरी जबाबदारी स्वीकारली. मुलांचे संगोपन, त्यांचे शिक्षण आणि संसार उभा ठेवण्याचा निर्धार करून त्यांनी रेल्वे सेवेत पाऊल ठेवले.

Mumbai News: न्यायालयीन कामकाजाचा न्यायमूर्तींच्या आरोग्यावर परिणाम, कामाच्या ताणाबाबत उच्च न्यायालयाची टिप्पणी दादरच्या गजबजाटात सुरुवात

त्यांच्या नोकरीची सुरुवात मुंबईतील सर्वाधिक गजबजलेल्या स्थानकांपैकी एक असलेल्या दादर स्थानकावर झाली. रेल्वेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आणि धावपळीच्या या स्थानकावर पॉईंट्समन म्हणून काम करणे कोणासाठीही आव्हानात्मक असते. सततची गाड्यांची ये-जा, प्रवाशांची प्रचंड गर्दी आणि कधीही उद्भवू शकणाऱ्या आपत्कालीन परिस्थिती… या सगळ्यांमध्ये काम करताना धैर्य आणि सतर्कता दोन्ही आवश्यक असतात.

मात्र रूपाली खरे यांनी सुरुवातीपासूनच धाडसाने काम केले. त्या सांगतात, “मी कधीच भीती बाळगून नोकरी केली नाही. अपघात असो, गाडी थांबली असो किंवा भांडणं झाली असोत… मी नेहमी पुढे जाऊन परिस्थिती हाताळली. काम म्हणजे जबाबदारी आहे आणि ती प्रामाणिकपणे पार पाडायची, एवढंच माझ्या मनात असतं.दादरमधील अनुभवांनी त्यांना अधिक धैर्य दिले. नंतर माटुंगा स्थानक ‘पिंक स्टेशन’ म्हणून विकसित झाल्यानंतर त्यांची बदली तेथे करण्यात आली. महिलांच्या कर्मचाऱ्यांनी चालवलेले हे स्थानक असल्यामुळे तेथे काम करताना त्यांना वेगळा अनुभव मिळाला.

पुणे-मुंबईचा प्रवास आणि ड्युटी

रूपाली खरे मूळच्या पुण्याच्या असल्याने त्यांचा प्रवास अनेकदा पुणे–मुंबई असा असतो. रेल्वेतील कष्टाची ड्युटी आणि त्यासोबत लांबचा प्रवास, हे दोन्ही त्या अनेक वर्षांपासून निभावत आहेत.सकाळी पुण्याहून ट्रेन पकडून त्या मुंबईत येतात आणि सायंकाळपासून दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत आपली ड्युटी पार पाडतात. पुणे-मुंबईची ये-जा करताना कधी थकवा जाणवतो; पण जबाबदारीची जाणीव त्यांना थांबू देत नाही. काही वेळा त्या मालाड येथे मावशीकडे राहूनही ड्युटी करतात. प्रवास, घर आणि काम या तिन्ही गोष्टी सांभाळत त्यांनी आयुष्याचा तोल राखला आहे.

Mumbai News: ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाईचे सावट, मुंबईकर बेजार; पाण्यासाठी नगरसेवकांचा आक्रोश मुलांसाठी सुरू असलेली धडपड

रूपाली खरे यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. मोठी मुलगी उच्च शिक्षण घेत आहे, दुसरी बारावीत आहे, तर मुलगा नवीत शिकत आहे. आईने केलेल्या संघर्षाची जाणीव या तिन्ही मुलांना आहे.रूपाली खरे सांगतात,माझ्या मुलांना माझा खूप अभिमान वाटतो. ते म्हणतात, ‘मम्मी, तू आमच्यासाठी खूप कष्ट केलेस. आम्ही मोठे झालो की तुला आराम देऊ.’मुलांच्या या शब्दांतून त्यांना पुढे काम करण्याची नवी उर्जा मिळते.

महिला दिनानिमित्त संदेश

महिला दिनानिमित्त रूपाली खरे समाजाला साधा पण अत्यंत महत्त्वाचा संदेश देतात. “माणुसकी ही सर्वांत मोठी गोष्ट आहे. एखाद्याला अडचण आली तर मदतीला धावून जा. तो रेल्वेतला असो किंवा बाहेरचा; पण माणूस म्हणून एकमेकांना साथ देणं महत्त्वाचं आहे,असे त्या सांगतात.

धैर्याची प्रेरणादायी कहाणी

पतीचे अकाली निधन, तीन मुलांची जबाबदारी, कठीण रेल्वे ड्युटी आणि रोजच्या आयुष्याचा संघर्ष… या सगळ्यांवर मात करत रूपाली खरे आजही ठामपणे उभ्या आहेत.

Mumbai News: वृद्ध आईचा छळ करणाऱ्या मुलाला दणका! घर सोडण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

मुंबईच्या धावत्या रेल्वे रुळांवरून दररोज हजारो गाड्या वेगाने धावतात. त्या गाड्यांच्या सुरक्षिततेमागे अनेक अनामिक हात रात्रंदिवस काम करत असतात. त्या हातांमध्ये रूपाली खरे यांच्यासारख्या जिद्दी महिलांचाही मोलाचा वाटा आहे.एका आईची जिद्द, कर्तव्याप्रती निष्ठा आणि संकटांवर मात करण्याची ताकद… या सगळ्यांचा संगम म्हणजे रूपाली खरे. रेल्वेच्या रुळांवर उभे राहून कर्तव्य निभावताना त्या केवळ एक कर्मचारी म्हणून नव्हे, तर धैर्याने आयुष्य जगणाऱ्या हजारो महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण ठरत आहेत.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.