सूर्यकुमार यादवच्या धडाकेबाज नेतृत्वात टीम इंडियाने आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा ९६ धावांनी धुव्वा उडवत नवा इतिहास रचला आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या अटीतटीच्या लढतीत भारताने विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा जेतेपद पटकावले. यामुळे भारताने तीन वेळा टी-२० विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे. तसेच दोनदा विश्वविजेतेपद मिळवणारा भारत हा जगातील पहिला संघ ठरला आहे. यानंतर आता भारतीय टीमवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. भारताच्या विजयानंतर काही मिनिटांतच भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली. सध्या ही पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे.
भारत विरुद्ध न्यूझीलंड या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने २० षटकांत ५ बाद २५५ धावांचा विशाल डोंगर उभा केला. संजू सॅमसन, अभिषेक शर्मा आणि इशान किशन या तिघांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांना अक्षरश: धूळ चारली. तसेच सलामीवीरांच्या तुफानी अर्धशतकांमुळे भारताने मोठी मजल मारणं शक्य झाले. भारताने दिलेल्या या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या नाकी नऊ आले. भारताच्या २५५ धावांचा पाठलाग करणाऱ्या टीम न्यूझीलंडचा डाव १९ व्या षटकात १५९ धावांतच कोलमडला. यात जसप्रीत बुमराहने १५ धावांत ४ विकेट्स न्यूझीलंडचा सुपडा साफ केला. तर अक्षर पटेलने ३ विकेट्स घेत विजयात मोलाचा वाटा उचलला. या विजयानंतर खेळाडूंनी मैदानावर जोरदार सेलिब्रेशन केले.
भारत विरुद्ध न्यूझीलंड हा सामना पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली होती. रोहित शर्मा, जय शाह आणि महेंद्रसिंग धोनी यांनी व्हीव्हीआयपी बॉक्समध्ये बसून या मॅचचा आनंद लुटला. टीम इंडियाच्या विजयानंतर महेंद्रसिंह धोनीने इन्स्टाग्रामवर एक खास पोस्ट शेअर केली. त्यात त्याने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचे कौतुक केले आहे.
भारतीय टीमने अहमदाबादमध्ये इतिहास रचला! भारतीय क्रिकेट संघ, सपोर्ट स्टाफ आणि जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे खूप खूप अभिनंदन. तुम्हा सर्वांना खेळताना पाहणे हा एक विलक्षण अनुभव होता. कोच साहेब, तुमच्या चेहऱ्यावरील हसू खूप छान दिसतेय. तीव्र जिद्द आणि चेहऱ्यावरील स्मितहास्य हे एक जबरदस्त समीकरण आहे. खूप छान मित्रांनो, आता या विजयाचा आनंद साजरा करा आणि बुमराहबद्दल काही न लिहिलेलेच बरे… चॅम्पियन गोलंदाज, अशी पोस्ट महेंद्रसिंग धोनीने केली.
दरम्यान 256 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडच्या फलंदाजांवर सुरुवातीपासूनच दबाव दिसून आला. टिम सीफर्ट आणि फिन अॅलन यांनी पहिल्या विकेटसाठी 31 धावांची भागीदारी केली, पण त्यानंतर कीवी संघाची घसरण सुरू झाली. न्यूझीलंडकडून टिम सीफर्टने सर्वाधिक 52 धावा केल्या. त्याने 26 चेंडूत 2 चौकार आणि 5 षटकार मारले. मात्र संघातील सात फलंदाज एक अंकी धावसंख्येत बाद झाले. केवळ 72 धावांवर न्यूझीलंडचे पाच फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले होते. डॅरिल मिचेलने 11 चेंडूत 17 धावा केल्या, तर कर्णधार मिचेल सॅन्टनरने 35 चेंडूत 43 धावांची झुंज दिली, पण ती संघाला विजय मिळवून देण्यासाठी अपुरी ठरली. भारताकडून गोलंदाजीत जसप्रीत बुमराहने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या, तर अक्षर पटेलने 3 विकेट्स घेत न्यूझीलंडच्या फलंदाजीचा कणा मोडला.