चिमुकल्यांचा आठवडा बाजार
बदलापूरच्या शाळेत ‘हिरवी क्रांती’; विद्यार्थ्यांच्या कष्टाने बहरली परसबाग
बदलापूर, ता. ९ (बातमीदार) : पुस्तकी ज्ञानासोबतच प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण देण्याचा एक अनोखा प्रयोग बदलापूरमधील नगर परिषद शाळा क्र. १५, एरंजाड येथे राबवण्यात आला आहे. प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेअंतर्गत या आयएसओ मानांकन प्राप्त शाळेतील विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली चक्क स्वतःची परसबाग फुलवली असून, सेंद्रिय शेतीचा आदर्श वस्तुपाठ घालून दिला आहे.
मुख्याध्यापिका वृषाली बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी मिळून शाळेच्या परिसरात विविध भाज्यांची लागवड केली आहे. यात प्रामुख्याने वांगी, मिरची, कोबी, टोमॅटो, फ्लॉवर, दुधी भोपळा, डांगर, शेवगा या फळभाज्यासह मुळा, पालक, मेथीचे पीक घेण्यात आले आहे. त्याचबरोबर दालचिनी, जायफळ, तेजपत्ता, हळद, आंबा, सीताफळ, कलिंगडची लागवड केली आहे. विशेष म्हणजे, या बागेसाठी पूर्णपणे गांडूळ खत आणि कंपोस्ट खताचा वापर केला जातो, जे शाळेतच तयार केले जाते. या परसबागेतील ताज्या भाज्यांचा वापर विद्यार्थ्यांच्या रोजच्या माध्यान्ह भोजनात केला जात असल्याने त्यांना पौष्टिक आहार मिळत आहे. केवळ शेतीच नाही, तर व्यवहारज्ञान शिकण्यासाठी २६ फेब्रुवारी रोजी शाळेत ''आठवडी बाजार'' भरवण्यात आला होता. पहिली आणि दुसरीच्या चिमुकल्यांनी स्वतः पिकवलेल्या भाज्यांची विक्री केली.
पर्यावरण रक्षणाचा संदेश
भाजी देताना प्लास्टिकचा वापर टाळून कापडी पिशव्यांचा वापर करत विद्यार्थ्यांनी पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश दिला. केंद्र समन्वयक सोलसे सर, मुख्याध्यापक पाटील सर, माधवी धांडे मॅडम आणि अनेक पालकांनी या बाजाराला भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
उद्योजकतेचे धडे
नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, मुख्याधिकारी मारुती गायकवाड आणि शिक्षण सभापती प्रियांका दामले यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला आहे. कार्यशिक्षण तासिकेचा उपयोग करून घेत विद्यार्थ्यांना निसर्गाची ओढ, श्रमाचे महत्त्व आणि बचतीची सवय लावणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थी स्वतः बागेची निगा राखतात, त्यामुळे त्यांना शेती आणि पोषणाचे प्रत्यक्ष ज्ञान मिळत आहे. यातून त्यांचा आत्मविश्वासही वृद्धिंगत झाला आहे."