मुंबई : पश्चिम आशियामध्ये सुरू असलेल्या इराण-इस्त्रायलच्या संघर्षाचा फटका आता भारताला बसत असल्याचं दिसून येतंय. या युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एलपीजी सिलेंडरबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम मंत्रालयाने घरगुती एलपीजी सिलेंडरच्या बुकिंगमधील अंतर 21 दिवसांवरून वाढवून 25 दिवस इतके केले आहे. त्यामुळे ग्राहकांना आता एक गॅस बुकिंग केल्यापासून 24 दिवसांनी दुसरा गॅस बुकिंग करता येणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, हा निर्णय गॅसचे ब्लॅक मार्केटिंग आणि साठेबाजी रोखण्यासाठी घेण्यात आला आहे. सरकारने मात्र सध्या देशात एलपीजी, पेट्रोल किंवा डिझेलची कमतरता नसल्याचे स्पष्ट केलं आहे.
पेट्रोलियम मंत्रालयाने काही दिवसांपूर्वीच एलपीजी सिलेंडर बुकिंगमधील अंतर 15 दिवसांवरून 21 दिवस केले होते. मात्र आता हा कालावधी आणखी वाढवून 25 दिवस करण्यात आला आहे. म्हणजेच ग्राहकांना दोन बुकिंगदरम्यान किमान 24 दिवसांचे अंतर ठेवावे लागणार आहे.
पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वीच घरगुती एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 60 रुपयांची वाढ करण्यात आली. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) च्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये आता 14.2 किलोचा नॉन-सब्सिडी एलपीजी सिलेंडर 913 रुपयांना मिळत आहे. याआधी त्याची किंमत 853 रुपये होती. तर मुंबईमध्ये ही किंमत 912 रुपये इतकी आहे.
मुंबई: 912.50
कोलकाता: 939
चेन्नई: 928.50
एलपीजी गॅसमधील ही नवीन दरवाढ 7 मार्चपासून लागू झाली आहे.
हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या 19 किलोच्या कॉमर्शियल एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 114.5 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीमध्ये आता या सिलेंडरची किंमत 1,883 रुपये झाली आहे. या वर्षात आतापर्यंत कॉमर्शियल एलपीजीच्या दरात 302.50 रुपयांची वाढ झाली आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थींना दरवर्षी 12 सिलेंडरपर्यंत प्रत्येक सिलेंडरवर 300 रुपयांची सबसिडी देण्याचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे. पश्चिम आशियामधील परिस्थिती लक्षात घेता सरकारने एलपीजी पुरवठा आणि बाजारातील परिस्थितीवर लक्ष ठेवले असून पुढील काळात आणखी काही निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.
आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे संपुर्ण जगभरात ऊर्जा संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतात व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा थांबवण्यात आल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे घरगुती गॅसच्या दरांमध्येही वाढ झाली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दरही वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. अशातच केंद्र सरकारच्या सूत्रांकडून महत्त्वाची माहिती समोर आली आहे. देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार नाहीत, याची ग्वाही सरकारी सूत्रांनी दिली आहे.
ही बातमी वाचा: