सद्गुरू - ऋणानुबंध हा कर्माचा एक विशिष्ट पैलू आहे; तो कर्माची एक विशिष्ट रचना आहे. जिथे जिथे काही प्रमाणात भेटीगाठी होतात आणि एकत्रित वेळ घालवला जातो, तिथे काही ऋणानुबंध तयार होतात. विशेषतः जेव्हा दोन शरीरे एकत्र येतात, तेव्हा ऋणानुबंध खूप खोलवर असतो. ही शरीरात होणारी एक प्रकारची नोंद आहे, हे शरीर घडलेल्या प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवत असते.
जर दुसऱ्या शरीराशी जवळीक झाली असेल, तर ते त्या विशिष्ट प्रकारच्या ऊर्जेची नोंद ठेवत असते. आता शरीराला लक्षात असते, जर अनेक भागीदार असतील तर कालांतराने हळूहळू शरीर गोंधळून जाते आणि हा गोंधळ त्या व्यक्तीच्या जीवनावर लाखो वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करेल.
दुसरी गोष्ट म्हणजे, तुम्ही कोणत्या प्रकारचे अन्न खाता. जेव्हा जेव्हा थोडी सुबत्ता येते, तेव्हा लोक असा विचार करतात की, त्यांना एकाच जेवणात सर्वकाही खायचे आहे. भारतात, पूर्वी लोक कधीही जेवणात दोन किंवा तीनपेक्षा जास्त पदार्थ खात नव्हते आणि ते तीन घटकपदार्थ नेहमीच एकमेकांसोबत सुसंगत असत. सुसंगत नसलेले अन्नपदार्थ जेवणात नसायचे.
आपल्या घरातील लोकांना शरीर इतके चांगले समजले होते की, त्यांना माहीत होते की जेव्हा ते एखादी ठरावीक भाजी शिजवत, तेव्हा ते फक्त एका ठरावीक प्रकारचीच आमटी बनवत असत. जेव्हा ते ही ठरावीक भाजी शिजवत, तेव्हा दुसऱ्या प्रकारची भाजी कधीही बनवत नसत, कारण पारंपरिकपणे, आपल्याला असे समजले होते, की जर आपण अमुक आणि अमुक एकत्र केले, तर शरीर गोंधळून जाते.
तर या दोन प्रमुख गोष्टी आहेत - लोक व्यवस्थित जेवत नाहीत आणि इतर शरीरांशी अविचारी जवळीक साधण्याची भावना- ज्यामुळे शरीराच्या पातळीवर एक विशिष्ट गोंधळ निर्माण होईल, जो कालांतराने त्याचे परिणाम दाखवेल. जर शरीर गोंधळले, तर तुम्ही खोल संकटात आहात.
अनेक प्रकारे, सध्या सुरू असलेल्या चिंता, असुरक्षितता आणि नैराश्याच्या पातळीचे एक मुख्य कारण म्हणजे शरीर गोंधळलेले आहे. एकदा का तुमचे शरीर गोंधळले की, तुम्ही अनेक प्रकारे गोंधळून जाल. लोक कोणत्याही कारणाशिवाय वेडे होतात, कारण शरीर स्वतः गोंधळलेले असते.
हे नैतिकतेच्या पातळीवर नाही. हे नैतिक वास्तव नाही, ती एक विशिष्ट अस्तित्वात्मक प्रक्रिया आहे. प्रत्येक कृतीचा एक परिणाम असतो. जर तुम्ही मनाचा वापर करून काही ठरावीक गोष्टी केल्या, तर काही विशिष्ट परिणाम होतील. जर तुम्ही तुमच्या शरीराचा वापर करून काही ठरावीक गोष्टी केल्या, तर काही विशिष्ट परिणाम होतील.
या अशा गोष्टी आहेत ज्या सखोलपणे समजून घेतल्या गेल्या आणि त्याभोवती जीवनाची रचना एका विशिष्ट पद्धतीने केली गेली. आता, स्वातंत्र्याच्या नावाखाली आपल्याला सर्वकाही उद्ध्वस्त करायचे आहे आणि दुःखी व्हायचे आहे. कदाचित काही शतकांनंतर आपल्याला कळेल की, ही जगण्याची पद्धत नाही.