दौंड, ता. २० : शेतकऱ्यांना एकत्र आणून गटशेती व सामूहिक उत्पादक गट तयार करण्याचा उपक्रमांतर्गत ‘सत्यमेव जयते फार्मर कप’ स्पर्धेकरिता दौंड तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. खरीप हंगाम २०२६- २०२७ साठी ही स्पर्धा घेतली जात आहे.
दौंड पंचायत समिती सभागृहात शुक्रवारी (ता. १३) हे प्रशिक्षण पार पडले. कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण घेण्यात आले. पंचायत समितीचे गट विकास अधिकारी अरुण मरभळ, तालुका कृषी अधिकारी अजिंक्य दुधाणे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी रमेश भद्रोड, कृषिभूषण वसूधा सरदार, डॉ. यशवंत खताळ आदी उपस्थित होते. दौंड तालुक्यात ४० गटशेती व सामूहिक उत्पादक गट तयार केले जात असून, त्याद्वारे किमान ६०० शेतकऱ्यांना सहभागी करून घेतले जाणार आहे.
यावेळी पाणी फाउंडेशनचे मुख्य मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, ‘‘शेतकऱ्यांनी गट तयार करून सामूहिक पद्धतीने शेती केल्यास उत्पादन खर्च कमी होतो, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुलभ होतो आणि बाजारपेठेत पिकांना चांगला दर मिळू शकतो.’’