केंद्रीय विद्यालयात मराठीचा विसर
esakal March 22, 2026 08:45 PM

केंद्रीय विद्यालयात मराठीचा विसर
मनसे आक्रमक, पालिकेकडून कडक कारवाईचा इशारा
ठाणे, ता. २२ : कोलशेत येथील केंद्रीय विद्यालयात मराठी विषय शिकवला जात नसल्याचा गंभीर प्रकार समोर आला असून, यावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठी विषयाची अंमलबजावणी न झाल्यास आंदोलनाचा इशारा मनविसेने दिला होता, ज्याची दखल घेत ठाणे महापालिका शिक्षण विभागाने संबंधित शाळेला कडक निर्देश दिले आहेत. शासन निर्णयानुसार मराठी भाषा अनिवार्य करण्याचे आदेश पालिकेने बजावले आहेत.

महाराष्ट्रातील ७० केंद्रीय विद्यालयांमध्ये सुमारे ८१,६२० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, कोलशेत येथील केंद्रीय विद्यालयात मराठी विषयासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली नाही आणि हा विषय शिकवलाही जात नाही. मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी फेब्रुवारी २०२६ मध्ये यासंदर्भात तक्रार केली होती. राज्याची राजभाषा आणि नुकताच ‘अभिजात’ दर्जा मिळालेली मराठी भाषा डावलली जात असल्याने विद्यार्थ्यांवर याचे गंभीर परिणाम होत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.

ठाणे महापालिकेच्या शिक्षण विभागाने या प्रकरणाची तातडीने दखल घेत केंद्रीय विद्यालय संघटनेच्या क्षेत्रीय कार्यालयाला लेखी पत्र धाडले आहे. राज्य सरकारच्या नियमानुसार सर्व शाळांमध्ये मराठी ही दुसरी भाषा म्हणून शिकवणे बंधनकारक आहे. आगामी २०२६-२७ शैक्षणिक वर्षापासून कोणत्याही परिस्थितीत मराठीचे अध्यापन सुरू करावेच लागेल. तसेच सूचनांचे पालन न झाल्यास शाळेवर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल. यापूर्वी शालेय शिक्षणमंत्र्यांनीही मराठी भाषा न शिकवणाऱ्या शाळांची मान्यता रद्द करण्याचे संकेत दिले होते, त्या पार्श्वभूमीवर पालिकेचे हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

आंदोलनाचा इशारा
केंद्रीय विद्यालय कोलशेत येथे मराठी विषय न शिकवणे हा थेट नियमभंग आहे. केंद्र सरकारने मराठीला ‘अभिजात’ दर्जा दिला असताना, केंद्रीय विद्यालये मात्र मराठीचा अपमान करत आहेत. आगामी शैक्षणिक वर्षात मराठी विषय सुरू न झाल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मनविसेचे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी दिला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.