उन्हाळी सुट्टीत शिक्षकांना जनगणनेची जबाबदारी
शहापूर (वार्ताहर) : यंदाच्या उन्हाळी सुट्ट्यांमध्ये शिक्षकांना जनगणनेचे काम सोपविण्यात येणार असल्याने सुट्टीवर मर्यादा येणार आहेत. २ मे ते १४ जून या कालावधीत शिक्षकांना नियमित सुट्टी मिळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. या उपक्रमासाठी ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद; तसेच खासगी अनुदानित शाळांमधील साडेपाच हजार शिक्षकांची नेमणूक करण्याची तयारी प्रशासनाकडून सुरू आहे. यामध्ये अनुदानित, विनाअनुदानित, प्राथमिक, माध्यमिक तसेच महाविद्यालयीन शिक्षकांचा समावेश असणार आहे. १ मे रोजी परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर २ मेपासून शाळांना अधिकृत उन्हाळी सुट्टी लागणार आहे. मात्र, १६ मे ते १४ जून या कालावधीत शिक्षकांना जनगणनेअंतर्गत विविध याद्या तयार करण्याचे काम दिले जाणार आहे. दरम्यान, या कालावधीत संबंधित शिक्षकांनी मुख्यालय सोडू नये, अशा स्पष्ट सूचना शिक्षण विभागाकडून दिल्या आहेत. त्यामुळे सुट्टीच्या कालावधीतही शिक्षकांना शासकीय कामात गुंतवले जाणार असल्याने शिक्षकवर्गात नाराजी व्यक्त होत आहे.