आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या पर्वाला शनिवारी 28 मार्चपासून श्रीगणेशा होणार आहे. 19 व्या हंगामाच्या सलामीच्या सामन्यात गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु रजत पाटीदार याच्या कॅप्टन्सीत विजयी सुरुवात करण्यासाठी तयार आहे. आरसीबीसमोर या सामन्यात इशान किशन याच्या नेतृत्वातील सनरायजर्स हैदराबादचं आव्हान असणार आहे. आरसीबी आणि सनरायजर्स हैदराबाद दोन्ही संघांनी सलामीच्या सामन्याआधी जोरदार सराव केला आहे. सामन्याला काही तास बाकी असताना आता मोठी अपडेट समोर आली आहे. आयपीएलच्या या 19 व्या पर्वात अनुभवी फिरकीपटू आर अश्विन याची एन्ट्री झाली आहे.
अश्विन 19 व्या मोसमात कोणत्या भूमिकेत?चेन्नई सुपर किंग्सचा माजी फिरकीपटू आर अश्विन याने 19 व्या मोसमाच्या मिनी ऑक्शनआधी आयपीएलला अलविदा केला. अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटनंतर आयपीएलमधूनही निवृत्ती घेतली. त्यानंतर आता अश्विन नव्या भूमिकेत दिसणार आहे. अश्विन 19 व्या हंगामात कॉमेंटेटर म्हणून भूमिका बजावणार आहे. अश्विनची आयपीएलसाठी कॉमेंट्री पॅनेलमध्ये निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांना अश्विनचं नव रुप पाहायला मिळणार आहे.
अश्विनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवृत्तीनंतर युट्यूबकडे मोर्चा वळवला. अश्विनने युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून क्रिकेटवर चर्चा करायला सुरुवात केली. अश्विनला क्रिकेटचा प्रदीर्घ असा अनुभव आहे. कोणत्या क्षणी काय करायला हवं? याची जाणीव अश्विनला आहे. अश्विनने अनेकदा युट्यूब शोमधून अचूक विश्लेषण केलं आहे. त्यामुळे चाहत्यांना अश्विनकडून माहितीपूर्ण समालोचनाची अपेक्षा असणार आहे.
आर अश्विनची आयपीएल कारकीर्दआर अश्विन याला आयपीएल स्पर्धेत खेळण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. अश्विनने 220 सामन्यांमधील 217 डावांत 187 विकेट्स मिळवल्या होत्या. तसेच अश्विनने 98 डावात बॅटिंग करताना 1 अर्धशतकासह 833 धावा केल्या होत्या.
अॅश अण्णा हिंदी समालोचनासाठी सज्ज
ओपनिंग सेरेमनी रद्द!🚨 RAVICHANDRAN ASHWIN IN IPL 2026 🚨
– Ashwin will be doing Hindi Commentary on JioHotstar for IPL 2026. 🔥 pic.twitter.com/CEWTewJZjt
— Johns. (@CricCrazyJohns)
दरम्यान 19 व्या मोसमाआधी होणारी ओपनिंग सेरेमनी रद्द करण्यात आली आहे. आरसीबीच्या 18 व्या मोसमातील विजयानंतर एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विजेत्या खेळाडूंच्या सन्मानासाठी खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमादरम्यान स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे आरसीबीच्या विजयाला गाळबोट लागलं होतं. त्यामुळे यंदा बीसीसीआयने ओपनिंग सेरेमनी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.