Beed Khamgaon Pandharpur National Highway News : बीड जिल्ह्यातून जाणाऱ्या खामगाव- पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे धारुर घाटातील काम रखडले आहे. यामुळं मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत. आता हा महामार्गअपघाताचे केंद्रच बनला आहे. कारण अरुंद रस्ता, तीव्र उतार, वळण यामुळं गेल्या 2 वर्षात तब्बल 65 अपघात घडले असून 21 जणांचा बळी गेला आहे. तर अनेकांना कायमस्वरुपी अपंगत्व आलं आहे. आणखी किती बळी राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाला घ्यायचे आहेत असा संतप्त सवाल प्रवासी आणि वाहनधारकांमधून उपस्थित केला जात आहे.
मालवाहतूक अवजड वाहने, ऊस वाहतूक करणारे वाहने आणि प्रवासी वाहने यामुळे घाटात अनेक वेळा वाहतूक कोंडीची देखील समस्या निर्माण होत असते. धारुर घाटामध्ये राष्ट्रीय महामार्गाला सुरक्षेच्या कुठलाही उपाययोजना नसल्याचे दिसते. यामध्ये सुरक्षा कठडे, दिशादर्शक फलक, नसल्याने अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. डोंगर उतार असल्याने तीव्र घाट, खोल दरी असल्यामुळं अपघातग्रस्त वाहने अद्याप दरीतून बाहेर देखील काढता आलेली नाहीत.