अमेरिका, इस्त्रायल आणि इराणमध्ये सध्या भीषण युद्ध सुरू आहे. या युद्धामुळे मध्य पूर्वेत मोठा तणाव निर्माण झाला असून, याचा मोठा परिणाम हा इंधन पुरवठ्यावर होताना दिसत आहे. इराणने स्ट्रीट ऑफ होमूर्ज वाहतुकीसाठी बंद केल्यानं अनेक देशांवर सध्या मोठं इंधन संकट निर्माण झालं आहे. दरम्यान याचा काही प्रमाणात भारताला देखील फटका बसला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांसोबत देशात सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी चर्चा केली. या बैठकीनंतर आज शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो की त्यांनी काल सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली. सध्या जगभरात मोठं संकट आहे, या संकटाच्या काळात मोदी हे ज्या पद्धतीनं देशाचं नेतृत्व करत आहेत, त्याचं कौतुक सर्वच मुख्यमंत्र्यांनी या बैठकीमध्ये केलं. आज आपल्या शेजारच्या अनेक देशांमध्ये आणि काही विकसीत देशांमध्ये देखील इंधन संकटामुळे काम बंद ठेवण्याची वेळ आली आहे, काही देशांनी 4 दिवसांचा आठवडा केला आहे. काही जणांनी वर्क फॉर्म होमचा पर्याय निवडला. अशा स्थितीमध्ये मोदी यांनी या परिस्थितीला ज्या पद्धतीने सांभाळं त्यामुळे आपल्याला या संकटाचा फटका बसला नाही, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.
दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, सरकारने पेट्रोल, डिझेलचा तुटवडा होऊ दिला नाही. इंधनाच्या ज्या किंमती वाढल्या त्याचा भार देखील केंद्र सरकारनेच उचलला. ग्राहकांना या दरवाढीची कोणतीही झळ बसली नाही. लोकांना एलपीजी सिलिंडर पुरवण्यात आले. घरगुती सिलिंडरचा पुरवठा 75 टक्क्यांनी वाढवला, यासाठी सर्व मुख्यमंत्र्यांनी मोदी यांचं कौतुक केलं आहे.
जे लोक राज्यांमध्ये अफवा पसरवत आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असंही मोदी यांनी यावेळी म्हटलं. देशात इंधनाचा तुटवडा नाही, पुढे जी परिस्थिती निर्माण होईल, त्यासाठी देखील स्टॅटजी तयार आहे. त्यामुळे जे इंधन तुटवड्याची किंवा लॉकडाऊची अफवा पसरवतील त्यांच्यावर कडक कारवाई करू असा इशाराही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.