Maharashtra Weather Update मुंबई : राज्यभरात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं (Unseasonal Rain) संकट घोंगावणार असल्याची शक्यता आहे. 30 मार्चपासून राज्यात आभाळी हवामान आणि दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवीन सत्र सुरू होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. 30 मार्च रोजी प्रामुख्याने खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस आणि काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. तर उर्वरित विदर्भात देखील काही प्रमाणात हवामानात बदल दिसून येऊ शकतो. असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने (IMD) वर्तविला आहे.
Maharashtra Unseasonal Rain : 1 ते 4 एप्रिल दरम्यान वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज
दरम्यान, 30 मार्चच्या तुलनेत 31 मार्च रोजी एकंदरीत वादळी पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. मात्र, या भागांमध्ये काही प्रमाणात अस्थिर हवामान आणि वादळी पाऊस पडू शकतो. त्यानंतर 1 ते 4 एप्रिल दरम्यान वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे या कालावधीत मध्य महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा आणि विदर्भातील ठिकठिकाणी आभाळी हवामान, दुपारनंतरचा वादळी पाऊस, आणि काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
IMD Alart : शेतकऱ्यांनो सावधान, काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवा
संभाव्य परिस्थिती बघता शेतकऱ्यांनी पुढील काही दिवस हवामानाच्या या स्थितीनुसार शेतीची कामे नियोजित करावीत. सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने काढणी केलेली पिके सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. तसेच वादळी वारे, पाऊस आणि संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे.
मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीज खांब आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असेही आवाहन करण्यात येत आहे.
Weather Update : खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ अन् मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस
राज्यात सध्या काही भागात अंशतः आभाळी हवामान असून ही स्थिती आठवडाभर कायम राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या दक्षिण भागात दुपारनंतर वादळी पाऊस पडू शकतो. तर 30 मार्च दरम्यान खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ व मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस, वादळी वारे तसेच काही ठिकाणी गारपिटीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. 31 मार्चलाही काही भागांमध्ये या हवामानाचा परिणाम दिसू शकतो. शेतकऱ्यांनी हवामानाच्या अद्ययावत अंदाजाकडे लक्ष ठेवून काढणी केलेली रब्बी पिके सुरक्षित ठेवावीत व आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे कृषी विभागाकडून आवाहन करण्यात आले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या