आपल्या विनोदबुद्धीने प्रेक्षकांना खळखळून हसवणारा अभिनेता राजपाल यादव चेक बाऊन्स प्रकरणात तिहार तुरुंगात शिक्षा भोगून जामिनावर बाहेर आला आहे. चित्रपट निर्मितीसाठी त्याने पाच कोटी रुपयांचं कर्ज घेतलं होतं, परंतु तो चित्रपट फ्लॉप ठरल्याने त्याला कर्ज फेडता आलं नाही. त्याने दिलेले सर्व चेक बाऊन्स झाल्याने अखेर त्याला तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करावं लागलं होतं. त्यानंतर बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या अनेक कलाकारांनी त्याची मदत केली होती. आता अभिनेता अक्षय कुमारने या प्रकरणावरून राजपालला सुनावलं आहे. अक्षय कुमारच्या आगामी ‘भूत बंगला’ या चित्रपटात राजपाल महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. या चित्रपटानिमित्त दिलेल्या एका मुलाखतीत अक्षय राजपालच्या चेक बाऊन्स प्रकरणावर मोकळेपणे व्यक्त झाला.
काय म्हणाला अक्षय?‘भूत बंगला’च्या प्रमोशनदरम्यान अक्षयने स्पष्ट सांगितलं की त्याने आधीच राजपालला चित्रपट निर्मिती न करण्याचा सल्ला दिला होता. यावेळी त्याने असंही सांगितलं की दिग्गज अभिनेते असरानी यांनी त्याला हा मोलाचा सल्ला दिला होता. असरानी यांनी त्यांच्या आयुष्यातील कठीण काळाचा उल्लेख करत अक्षयला सांगितलं होतं की चित्रपट निर्मिती करणं ही त्यांची सर्वांत मोठी चूक होती. याच अनुभवाच्या आधारावर अक्षयने राजपाल यादवलाही समजावलं होतं की, अभिनेत्यांनी निर्मिती क्षेत्रात उडी घेण्याआधी त्याविषयी आधी सखोल अभ्यास करावा. “आपण अभिनेते आहोत आणि निर्मात्यांचं काम खूप वेगळं असतं. शॉर्टकटने पैसे कमावण्याचा प्रयत्न करू नये”, अशा शब्दांत अक्षयने राजपालला समजावलं.
कलाकारांचं मानधन‘भूत बंगला’ या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक प्रियदर्शन आणि अक्षय कुमार बऱ्याच वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले आहेत. यामध्ये अक्षय कुमारसोबत परेश रावल, राजपाल यादव, वामिका गब्बी आणि तब्बू यांच्याही भूमिका आहेत. या चित्रपटासाठी अक्षयने सर्वाधिक मानधन घेतलं असून सर्वांत कमी फी राजपालला मिळाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या हॉरर कॉमेडी चित्रपटासाठी अक्षयला जवळपास 50 कोटी रुपये मानधन मिळालं आहे. तर तब्बूने 2.5 कोटी रुपये स्वीकारले आहेत. दिग्गज अभिनेते परेश रावल यांना 2 कोटी रुपये आणि अभिनेत्री वामिका गब्बीला 3 कोटी रुपये मिळाले आहेत. या सर्वांत राजपालला एक कोटी रुपये मानधन मिळाल्याची माहिती समोर येत आहे.