Sanjay Raut : मुंबई महापौरांच्या घशाच्या आजारावर प्रश्न राऊत म्हणाले,'एखाद्याच्या हाताला गुण असतो, तर एखाद्याच्या अवयवाला'
Tv9 Marathi April 01, 2026 03:45 PM

जैन धर्मगुरु नयन पद्मसागर महाराज यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला पाहिजे का? यावर राऊत म्हणाले की, “फडणवीसांना असं का वाटत नाही? ताराराणी संदर्भात अपमान झालाय हे मी का सांगायला पाहिजे? मनोज जरांगे पाटलांना का वाटत नाही? हे सगळ्यांना वाटलं पाहिजे” “तुम्ही कायदा आणलायना, मग मुनी, महाराजांना हे स्वातंत्र्य कोणी दिलं? हंबीरराव मोहितेंची कन्या महाराणी ताराराणी यांना परस्पर जैन घोषित करण्याचा अधिकार कोणी दिला? महाराष्ट्र सरकार षंढासारखं बघत राहिलं. आता तुमचे मुख्यमंत्री येतील सांगायला, हे संजय राऊत यांचं वक्तव्य खपवून घेणार नाही. हा मराठी माणसाचा, मराठा साम्राज्याचा अपमान आहे” असं संजय राऊत म्हणाले. गुरुदेवजींच्या औषधामुळे घशाचा आजार बरा झाला असं मुंबईच्या महापौर म्हणाल्याच पत्रकारांनी राऊतांना विचारला त्यावर राऊत म्हणाले की, “खरातच्या औषधामुळे सुद्धा अनेकांना बर वाटलं. ज्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणाला कोणत्या औषधाने बरं वाटलं. एखाद्याच्या हाताला गुण असतो, एखाद्याच्या दुसऱ्या कुठल्या अवयवाला गुण असतो”

महायुतीसरकारने आर्थिक वर्षाच्या शेवटच्या चार दिवसात 1100 अधिक निर्णय घेतले या प्रश्नावर राऊत बोलले की, “ते निर्णय अमलात येणार आहेत का?. ते निर्णय ठेकेदाराच्या हिताचे आहेत. गेल्या काही महिन्यात कॅबिनेटमध्ये महाराष्ट्राच्या हिताचे कोणते निर्णय झाले मला सांगा. त्यांच्या निर्णयाला विचारतोय कोण?”

‘मोदी अफवांच्या फॅक्टरीचे चेअरमन’

“एलपीजीची किंमत वाढणारचं. तुम्ही सरकारच्या बोलण्यावर विश्वास ठेऊ नका. सरकार खोटं बोलतय. एलपीजीची कमतरता राहणार. आंतरराष्ट्रीय परिस्थिती समजून घ्या. सरकार काही करु शकत नाही. जनतेला विश्वासात घ्या. खोटं बोलू नका. पाकिस्तानात लॉकडाऊन लागलाय” असा दावा राऊत यांनी केला. “विरोधी पक्ष अफवा पसरवतोय मग, मोदी केरळमध्ये जाऊन का सांगत आहेत, आम्ही तुम्हाला दोन सिलेंडर देऊ. हा निवडणुकीचा मुद्दा होऊ शकतो का?. मोदी अफवांच्या फॅक्टरीचे चेअरमन आहेत” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

‘हे अमित शाह यांनी स्थापन केलेले पक्ष’

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेत काही बदल झालेत. पक्षप्रमुखांच्या संमतीविना हे बदल झालेत. काही सेल्स वगळलेत त्यावर राऊत यांनी “मी माननीय शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मानतो. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला मानतो. सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे यांचे पक्ष हे अमित शाह यांनी स्थापन केलेले पक्ष आहेत” असं उत्तर दिलं.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.