“न्याय मिळण्यास उशीर होईल, पण तो मिळतोच” या वाक्याची सार्थता छत्रपती संभाजीनगरमध्ये एका दुर्दैवी प्रकरणात दिसून आली आहे. टाउन हॉल उड्डाणपुलावर झालेल्या भीषण अपघातात अल्पवयीन विद्यार्थिनी आकेफा मेहरीनचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात तिच्या कुटुंबीयांना तब्बल सात वर्षांनंतर न्याय मिळाला आहे. मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाने (Motor Accident Claims Tribunal) या प्रकरणात २७ लाख रुपये नुकसानभरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. ही रक्कम विमा कंपनी, वाहन मालक आणि चालक यांनी संयुक्तपणे अदा करावी, असे स्पष्ट निर्देश न्यायाधिकरणाने दिले आहेत.
नेमकं काय घडलं होतं?
या अपघातात मृत्यू झालेली आकेफा मेहरीन ही २२ एप्रिल २०१९ रोजी दुपारी दुचाकीवरून आरेफ कॉलनीहून भडकल गेटकडे जात होती. त्याच वेळी जामा मशिदीकडून वेगात येणाऱ्या एका कारने टाउन हॉल उड्डाणपुलावर तिच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. ही कार सिटी चौक पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक संतोष पाटे चालवत होते. अपघातात आकेफाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. उपचार सुरू असतानाच दोन दिवसांनंतर, २४ एप्रिल २०१९ रोजी तिचा मृत्यू झाला.
या घटनेनंतर आकेफाच्या आई-वडिलांनी अॅड. फय्याज पटेल आणि अॅड. सईद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मोटार अपघात न्यायाधिकरणात नुकसानभरपाईचा दावा दाखल केला होता. सुनावणीदरम्यान विमा कंपनीने “मृत मुलगी अल्पवयीन होती आणि तिच्याकडे दुचाकी चालवण्याचा परवाना नव्हता” असा युक्तिवाद केला. मात्र न्यायालयाने हा युक्तिवाद फेटाळून लावला.
न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाच्या विविध निर्णयांचा आधार घेत स्पष्ट केले की, केवळ पीडितेकडे परवाना नसल्यामुळे अपघाताची संपूर्ण जबाबदारी तिच्यावर टाकता येत नाही. अपघात हा कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे आणि वेगामुळे घडल्याचे सांगितले.
या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी कुटुंबीयांना सात वर्षे प्रतीक्षा करावी लागली. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने या घटनेची गंभीर दखल घेतल्यानंतर दोन वर्षांनी उपनिरीक्षक संतोष पाटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता.