महिलांना फसवून, भूलवून त्यांचे लैंगिक शोषण करणारा आणि या अत्याचाराचे रेकॉर्डिंग केल्याचा आरोप असलेला नाशिकचा भोंदू बाबा अर्थात अशोक खरात (Ashok Kharat) सध्या गजाआड असून एसआयटीकडून याप्रकरणात तपास सुरू आहे. अशोक खरात्चाय अनटेनंतर रोज नवनवी माहिती समोर येत असून त्यामुळे राज्यात मोठी खळबळ माजली आहे. त्याने अनेक गैरकृत्य, गैरव्यवहार केले असून त्याच्या घरच्यांचाही यात समावेश आहे का, याचा शोध घेण्यात येत आहे. सध्या अशोक खरात याची पत्नी कल्पना खरात ही सध्या फरार असून तिच्याबद्दलही बरीच माहिती समोर आली आहे. खरात याचे काळे कारनामे बाहेर आल्यानंतर आता त्याची पत्नी कल्पना खरात हिच्या विरोधात देखील शिर्डी पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय.
खरात कुटुंबीय सध्या कायद्याच्या कचाट्यात अडकले असून आता अशोक खरात याची पत्नी फरार पत्नी कल्पना हिचं माहेर हे सिन्नर तालुक्याचा शेवटच टोक असलेल्या पाडळी गावात आहे. कल्पना खरातचं बालपण अत्यंत गरिबीत गेलं आहे. प्राथमिक शिक्षण पाडळीत घेतल्यावर कल्पना ही तिथून पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शाळेत पायी चालत जायची. आज त्या घरात कल्पना खरातची भावजय, मंगल शिंदे आणि तिचा भाचा राहतो. कल्पना खरात हिला तीन भाऊ, त्यातील मोठा भाऊ वारला, तर तिचे दोन भाऊ नाशिकमध्येच स्थायिक झालेत. कल्पनाच्या भावजयीने पुढे येऊन, तिच्याबद्दल, तसेच अशोक खरातबद्दल काही माहिती दिली आहे.
अशोक खरात पाच मिनिटं यायचा आणि..
मी कल्पनाच्या लग्नाला नव्हते, तिचं लग्न कसं जमलं हे देखील मला माहित नाही. कारणत्यावेळेस मी डिलेव्हरीसाठी गेले होते, असं तिच्या भावजयीने सांगितलं. तिचं अशोक खरातशी लग्न ज्या मोठ्या भावाने जमवलं, त्यांना सगळं माहिती होती, पण आता सतरा वर्षे झाले ते देखील मयत झाले आहेत, असं त्यानी नमूद केलं.
अशोक खरात आणि कल्पना यांच्या वयात असलेला फरक याबाबत आमच्या घरात कधी चर्चा झाली नाही. लग्नानंतर अशोक खरात कधी इथे घरी यायचे, मात्र फक्त पाच मिनिटे थांबून मंडळीला घेऊन निघून जायचे. कल्पना ही वर्षातून एकदाच माहेरी यायची. पण ती कधी राहिली नाही, ती सकाळी येऊन दुपारी निघून जायची. कल्पना तिथे तिच्या सासरी मोठ्या घरात राहायची, मात्र इकडे कधीही घर बांधून द्यायचा विषय तिने घेतला नाही. आणि आम्ही देखील तशी अपेक्षा कधी ठेवली नाही असं असं भावजयीने सांगितलं.
कल्पना कोणाची फसवणूक करू शकत नाही, तिलाच फसवल्यासारखं झालंय
अशोक खरातचे कारनामे, त्याची काळी कृत्यं, हे सगळं प्रकरण समोर आल्यावर आम्हालाच धक्का बसला. आमची पोर खूप शांत आहे, स्वभावाने खूप गरीब आहे ती, तिच्या देखील काही गोष्टी लक्षात आल्या नसतील, म्हणूनच हे इतक वाढला असावं असा दावा त्यांनी केला. कल्पना कोणाची फसवणूक करू शकत नाही, तिलाच फसवल्यासारखं झालं आहे. गरीबीतून वर आलेली पोर ती, आता अशोक खरात ने तिलाच फसवलं की काय हे मला सांगता येणार नाही अशी शंकाही कल्पना खरात यांच्या भावजयीने बोलून दाखवली.