याशिवाय सेंद्रिय परसबाग, गांडूळ खत प्रकल्प, शालेय बँक, वाचनालय, स्वच्छता अभियान आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. शिक्षणासोबतच संस्कार, स्वावलंबन, पर्यावरण जागरूकता आणि व्यवहारिक ज्ञान यांचा समन्वय घडवून आणणारी ही शाळा आज खऱ्या अर्थाने आदर्श ठरत असून, इतर शाळांसाठी प्रेरणादायी मॉडेल बनत आहे.
एकेकाळी ओस पडलेली ही शाळा आज हिरवळ, विविध रंगीबेरंगी फुलझाडे आणि विद्यार्थ्यांच्या आनंदाने बहरलेली दिसते. परिसरातील सौंदर्य आणि स्वच्छता यामुळे विद्यार्थ्यांना शाळेकडे आपसूक आकर्षण वाटते. झाडांच्या सावलीत आणि अभ्यासपूर्ण वातावरणात शिक्षण घेताना विद्यार्थ्यांची एकाग्रता वाढत असून, त्यांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत सकारात्मक बदल दिसून येत आहेत.
शाळेत विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न ठेवता विविध स्पर्धा परीक्षांसाठी नियमित मार्गदर्शन केले जाते. स्कॉलरशिप, नवोदय, मंथन आणि इतर परीक्षांमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी यश मिळवले आहे. स्मार्ट बोर्ड, अँड्रॉइड टीव्ही आणि डिजिटल साधनांच्या वापरामुळे शिक्षण अधिक रंजक, सुलभ आणि परिणामकारक बनले आहे.
यासोबतच शालेय वेळेच्या व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी शाळेत सुसज्ज असे वाचनालय देखील आहे. विद्यार्थ्यांच्या कृतीशीलतेला वाव देण्यासाठी एक दिवस दप्तरमुक्त आणि निसर्गाच्या सानिध्यात शाळा भरविण्यात येते ज्यात विविध कृतीमध्ये विद्यार्थी आनंदाने सहभागी होतात.