राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आतापर्यंत अनेकदा तीन मुलं जन्माला घालण्याचा सल्ला दिला आहे. यावर आता स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. “मोहन भागवत आणि त्यांच्या प्रचारकांनी मुलं जन्माला घालून लोकसंख्या वाढवावी” असा स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी सल्ला दिला आहे. “एकाबाजूला सरकार म्हणते लोकसंख्येचा स्फोट होतोय, दुसरीकडे हे लोक लोकसंख्या वाढवण्याबद्दल बोलतात. संख्या इतकीच वाढवायची असेल तर तुम्ही लग्न करुन मुलं जन्माला का नाही घालत?. दुसऱ्यांवर ओझं का लादता?. पहिलं स्वत: करा, मग दुसऱ्यांना सांगा” असं स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले. ते बरेलीमध्ये बोलत होते.
“समाजाला दिशा देणाऱ्या लोकांनी स्वत:च्या व्यक्तीगत आयुष्यात तेच आचरण केलं पाहिजे, जो ते दुसऱ्यांना सल्ला देतात” असं स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती बोलले. “हिंदुंची संख्या वाढवण्याची चिंता असेल तर मोहन भागवत यांनी स्वत: लग्न करुन मुलं जन्माला घातली पाहिजेत. देशात धर्म आणि लोकसंख्येसारख्या संवेदनशील मुद्यांवर बोलण्याआधी नेत्यांनी आपल्या आचरणावर लक्ष दिलं पाहिजे” असं शंकराचार्य म्हणाले. त्यांनी समाजाला संतुलन आणि सदभावना कायम ठेवण्याचं आवाहन केलं. विरोधी पक्षाचं तुम्ही समर्थन करता का? या प्रश्नावर ते म्हणाले की, “सत्ताधारी म्हणतात आम्ही विरोधकांसोबत आहोत. मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही आमचं ऐका. गो मातेच्या रक्षणासाठी कायदा करा” “आम्ही तुमच्यासोबत उभे राहू. मी सत्ताधारी-विरोधक कोणासोबत नाहीय. जो कोणी आमचं ऐकलं, मी त्याच्यासोबत उभा राहीन” असं स्वामीअविमुक्तेश्वरानंद सरस्वती म्हणाले.
युद्धात दोन्ही बाजू योग्य असू शकत नाहीत
युद्ध होतं, तेव्हा त्यात दोन बाजू असतात. एक न्यायाची दुसरी अन्यायाची असं स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती रविवारी म्हणाले. “आज एकापक्षात अमेरिका-इस्रायल तर दुसऱ्याबाजूला इराण आहे. आश्चर्य याचं वाटतं जगातील सगळे विद्धान या मुद्यावर मौन धारण करुन आहेत. हा मानवतेविरुद्ध गुन्हा आहे. युद्धावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका काय होती? यावर मी काही बोलणार नाही असं ते म्हणाले. एक बाजू अन्याय करतेय आणि दुसरी तो अन्याय सहन करतेय हे सांगण विद्धवानाचा कर्तव्य असतं. कारण युद्धात दोन्ही बाजू योग्य असू शकत नाहीत” असं स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.
भारत ज्यूंच्या जाळ्यात फसतोय
“भारत सुरुवातीपासून कुठल्याही गटाचा भाग राहिलेला नाही. भारत युद्ध प्रसंगात कधी कोणाच्या बाजूने उभा राहिलेला नाही. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या मौनामुळे अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण होतोय की, ते कोणाच्यारी बाजूने आहेत. पंतप्रधान इस्रायलच्या बाजूने आहेत. ही बाब चिंता वाढवते. भारत ज्यूंच्या जाळ्यात फसतोय. युद्धामुळे गॅस सिलेंडरची समस्या आहे. पण पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना याची जाणीव नाहीय. कारण त्यांच्या निवासस्थानाची वीज जात नाही किंवा रेशन कमी पडत नाही. त्यांच्यासाठी सर्व चांगलं आहे पण जनता त्रस्त आहे” असं स्वामी अविमुक्तेश्वरानंद म्हणाले.