Atharva Manore Murder Case : नागपुरातील 14 वर्षीय अथर्व मनोरे अपहरण आणि हत्या प्रकरणासंदर्भात (Atharva Manore Murder Case) महत्वाची अपडेट समोर आली आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तीन्ही आरोपांचे वय 19, 20 आणि 22 वर्षे आहे. शेजारी राहणाऱ्या जयराम गोपाल यादव या मित्रानेच खंडणीसाठी अपहरण केलं होतं. आरोपी केतन उर्फ कुणाल रमेश शाहू आणि आयुष मोहन शाहू या दोघांच्या मदतीनं हे अपहरण केलं होतं. 40 ते 50 लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केलं होतं, अशी माहिती नागपूरचे पोलीस आयुक्त रविंद्र शिंघल यांनी दिली आहे.
20 दिवसांपासून अपहरणाचा प्लॅन सुरु होता. कोणालाही शंका येणार नाही म्हणून हनुमान जयंतीच्या शोभायात्रेतून अथर्व मनोरे याचे अपहरण केलं होतं. पण अथर्व बेशुद्ध होत नव्हता, त्यामुळे त्याला मारहाण केली त्यात त्याचा मृत्यू झाला. गट्टीखदान पोलीसांनी आज पहाटे तीन आरोपींना अटक केली आहे. पोलीसांकडून आरोपींची चौकशी सुरु करण्यात आली आहे. नागपूरात तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अथर्व ननोरेची अपहरण करुन हत्या करण्यात आली होती. गुरुवारी हनुमान जयंतीनिमित्त गिट्टीखदान येथे निघालेल्या शोभायात्रेतून 14 वर्षीय अथर्वचं अपहरण झालं होतं. शनिवारी दुपारी भरतवाडा परिसरात अथर्वचा मृतदेह आढळून आला होता.
अथर्व मनोरे याच्या मृतदेहची देखील विटंबना करण्यात आलेली होती. त्यामुळं अथर्वसोबत नेमकं काय घडलं? असा प्रश्न उपस्थित केला जात होता. अखेर या प्रकरणात तीन जणांना अटक झाली आहे. डोकं चक्रावणारी बाब म्हणजे या आरोपींमध्ये अर्थवच्या शेजारी राहणाऱ्यांसह त्याच्या मित्राचाही समावेश आहे. अर्थव मनोरेची अत्यांत भयानक रित्या हत्या झाली यावर स्थानिकांनी आंदोलनं केली होती तसेच विविध ठिकाणी मोर्चे काढण्यात आले होते. या प्रकरणावर जलद कारवाई करत स्थानिक पोलिसांनी आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींनी अथर्वच्या कुटुंबाकडून तब्बल 40 ते 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा डाव आखला होता. अपहरण केल्यानंतर त्यांनी अथर्वला एका ठिकाणी ठेवलं होतं. मात्र, अथर्व बेशुद्ध होत नसल्याने आरोपींनी त्याला मारहाण केली. यामध्येच त्याचा मृत्यू झाला होता.