8 वर्षानंतर मुंबईकरांच्या सेवेत मेट्रो 9, मुख्यमंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन; मिरा-भाईंदर ते मुंबई सुस्साट, दीड तासाचा प्रवास 30 मिनिटांत
अभिषेक मुठाळ April 07, 2026 05:13 PM

मुंबई : मुंबई मेट्रो 9 च्या (Metro) पहिल्या टप्प्याचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. सन 2018 साली या कामाचे भूमिपूजन केले होते. मुंबई आणि मिरा भाईंदरला जोडणारी मेट्रो तयार करण्याचे काम सुरु झाले असून एकनाथ शिंदे आणि मी ट्रायल रन देखील बघितला होता. त्यानंतर, दहिसर पूर्व ते काशीगाव उद्घाटन केले, आणि ही कनेक्टिंग मेट्रो झाली, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दरम्यान, या प्रकल्पामुळे मिरा-भाईंदर ते मुंबई दरम्यानची वाहतूक अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ होणार आहे. 

मेट्रो 9 चा दुसरा टप्पा आहे तो, साईबाबा नगर ते सुभाष चंद्र नगर या मेट्रोचा, याचे 96 टक्के काम पूर्ण झालंय. 4.3 किमीची ही मार्गिका असेल, ज्यात यंदाच्या वर्षीच  मेट्रोचे उद्घाटन होईल. मुंबई आणि मिरा भाईंदरला जोडण्याचे काम झालं आहे. ज्या प्रवासासाठी किमान 1 तास, कधी-कधी दोन सात लागतो तिथं आता 30 मिनिटात पोहोचता येईल, अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. 

मेट्रो 9 ही मेट्रो 7 ला जोडली आहे, पुढे ही मेट्रो 3 ला जोडली जाणार आहे, त्यामुळे येथून थेट कुलाबा देखील जाऊ शकणार आहात.  कार्ड 1 केलंय, इन्ट्रिग्रेशन झालं पाहिजे यासाठी प्रयत्न आहे. 80 टक्के कॅशलेस व्यवहार सुरू आहेत. सौर उर्जा, एलईडी लाइटिंग असेल, हरित प्रकल्प म्हणून गणला जाणार आहे. मेट्रो आणि फ्लायओव्हर एकाच पिलरवर आपण काम होताना बघितलं. अशात, हेच काम इथे देखील दिसते आहे. ठाणे जिल्ह्यात सुरु झालेली ही पहिली मेट्रो आहे, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले.  

ही मेट्रो आणि कोस्टल रोडमुळे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कमी होईल. दिल्ली नंतर मुंबई मेट्रो दुसऱ्या क्रमांकावर होईल. पुढील 3-4 वर्षात दिल्लीपेक्षा अधिक मेट्रो नेटवर्क सुरु व्हावं. 100 किमी पार ऑपरेशनल मेट्रो मुंबईत तयार झाली आहे. पुढील दोन वर्षात आणखी भर यात पडेल. वर्सोवा-घाटकोपर, दहिसर अंधेरी, दहिसर ते काशीगाव अशा लाईन ऑपरेशनल आहेत, सीबीडी ते नवी मुंबई, मेट्रो-३ आहे.  ई-बसेस असतील किंवा अर्लरनेंट फ्यूअल बसेस देखील पोहोचतील. वॉटर मेट्रो देखील लवकरच सुरु होईल, अशी माहितीही मुख्यमंत्र्‍यांनी यावेळी दिली.

मिरा-भाईंदरसाठी गेमचेंजर मेट्रो प्रकल्प

सध्या दहिसर ते काशीगाव हा प्रवास रस्त्याने 30 ते 45 मिनिटांचा होत असताना, मेट्रोमुळे तोच प्रवास केवळ 10 ते 15 मिनिटांत पूर्ण होणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन वेळेची बचत होणार आहे तसेच प्रदूषणातही घट होण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, या मेट्रो प्रकल्पामुळे मिरा-भाईंदर परिसरातील विकासाला चालना मिळणार असून, रोजगार, शिक्षण आणि व्यावसायासाठी रोज जाणाऱ्या शेकडो मिरा भाईंदर करांना याची मदत होणार आहे. एकंदरीत, मेट्रो 9 हा प्रकल्प मिरा-भाईंदरकरांसाठी ‘गेमचेंजर’ ठरणार असून, मुंबईशी जलद जोडणीचे नवे पर्व सुरू होणार आहे.

कसा असेल मेट्रो 9 मार्ग 

दहिसर पूर्व – काशिगावचा असा असेल मेट्रोचा मार्ग- (Dahisar To Kashigaon Metro Route)
मेट्रो लाईन 2ए आणि लाईन 7 या आता स्वतंत्रपणे चालवण्यात येणार असून, लाईन 7 ही लाईन 9 सोबत एकत्रितपणे (इंटिग्रेटेड कॉरिडॉर) चालणार आहे, ज्यामुळे अंधेरी पूर्व ते मीरा-भाईंदर (काशिगाव) दरम्यान थेट आणि अखंड प्रवास शक्य होणार आहे.
मेट्रो लाईन 7 व लाईन 9 (संयुक्त कॉरिडॉर) गुंदवली  ते काशिगाव
लाईन 9 सुरू झाल्यानंतर लाईन 7 आता विस्तारित स्वरूपात कार्यरत राहील.
मार्ग लांबी: 19.79 किमी
पहिली गाडी: सकाळी सुमारे 5.50
शेवटची गाडी: रात्री सुमारे 11.00
वारंवारता: गर्दीच्या वेळेत: सुमारे 5.50 मिनिटे
इतर वेळेत: 8 ते 10 मिनिटे
एकूण फेऱ्या: आठवड्याचे दिवस – 276, शनिवार – 223, रविवार – 205

Video: पार्थ चुकलास, कुठलाही पक्ष संपत नसतो, जमिनीवर राहणं महत्त्वाचं, रोहित पवार काय काय म्हणाले?

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.