इराणवर अमेरिका आणि इस्रायलने संयुक्त हल्ला केल्यानंतर महिनाभराहून अधिक काळ लोटला आहे. मात्र, युद्धाची कोंडी काही केल्या फुटत नाही अशी स्थिती आहे. आता तर होर्मुझ सामुद्रधुनी उघडली नाही तर गुरुवारी मोठा हल्ला करण्याची धमकी अमेरिकेने दिली आहे. इराणही आता इरेला पेटला असून युद्ध थांबवले जात नाही तोपर्यंत कोणतीही चर्चा करणार नाही असे इराणने बजावले आहे. अशाच स्ट्रेट ऑफ होर्मुझ पार करणे हे अतिशय कठीण झाले आहे. अशात सोशल मीडियात एक धक्कादायक दावा केला जात आहे. ज्यात भारतीय व्यापारी जहाज सामुद्रधुनी पार करण्यासाठी चक्क पाकिस्तानचा झेंडा वापरत आहेत. आता भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या संदर्भात आपले स्पष्टीकरण दिले आहे.
स्ट्रेट ऑफ होर्मुझ हा जगातील सर्वात महत्वाचा इंधन आणि गॅसच्या व्यापारी मार्गापैकी एक आहे. इराणने या मार्गावर तेलांच्या जहाजांची अडवणूक केली आहे. त्यामुळे रोज निरनिराळ्या अफवा येत आहेत. याच दरम्यान, पाकिस्तानच्या सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल केली जात आहे. यात काही प्रोपेगेंडा अकाऊंट फेक नेरेटिव्ह सेट करण्यासाठी कार्यरत आहेत. त्यात दावा केला जात आहे की इराणने केवळ पाकिस्तानी किंवा त्यांच्या सहकारी देशांचा झेंडा असलेल्या जहाजांनाच होर्मुझ पार करण्याची परवानगी देत आहे.त्यामुळे नाईलाजाने भारतीय व्यापारी जहाजांनी देखील त्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानचे झेंडे जहाजांवर लावले आहेत.
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकृत फॅक्ट चेक विंगने या दाव्यांना फेटाळून लावले आहे. या दाव्याला संपूर्णपणे निराधार आणि खोडसाळ म्हटले आहे. एमईएच्या अधिकृत फॅक्ट चेक अकाऊंट ने आज सकाळी एक पोस्ट टाकली आहे. त्यात लिहिले आहे की फेक न्यूज अलर्ट ! कृपया सोशल मीडियावरील एका खोट्या आणि कोणताही आधार नसलेल्या दाव्यांपासून सतर्क राहावे. पोस्टमध्ये तीन व्हायरल पोस्ट्सच्या स्क्रीनशॉट्स शेअर केले आहेत. ज्यावर मोठ मोठे ला FAKE स्टँप लावण्यात आले आहेत.
येथे पोस्ट पाहा –
पहिली पोस्ट पाकिस्तानचे पत्रकार अली के. चिश्ती यांची आहे. त्यात लिहीले होते : कन्फर्म्ड रिपोर्ट्स : किमान आठ भारतीय जहाजे इराणी रिव्हॉल्युशनरी गार्डच्या क्लिअरन्सनंतर हॉर्मुझवरुन निघाली आहेत. तर पाकिस्तान आपल्या झेंड्या खाली २० जहाजांसाठी ( २ प्रतिदिन ) डील केली आहे. तुम्ही विश्वास ठेवू शकता की आठ भारतीय जहाजे पाकिस्तानी झेंड्याचा वापर करुन येथून सुखरुप निघाली आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने या वृत्तास स्पष्ट रुपाने फेक म्हटले आहे.
दुसरी आणि तिसरी पोस्ट जावेद इक्बाल यांची होती. ज्यात दावा केला होता की भारतात पेट्रोल आणि एलपीजी संपला आहे. ६.५ लाख हॉटेल रेस्टॉरंट बंद झाले आहेत. युएईमध्ये तेलासाठी रांगा लागल्या आहेत. पाकिस्तानी सरकार स्थिती चांगल्या प्रकारे सांभाळत आहे. ही पोस्ट देखील भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने फेक असल्याचे म्हटले आहे.