पुणे : पुरंदर तालुक्यातील कर्नलवाडी (Karnalwadi) येथे घडलेल्या एका घटनेने समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला आहे. वडिलांच्या निधनानंतर एकुलत्या एका लेकीने धैर्याने अंत्यविधीची जबाबदारी स्वतः पार पाडत 'लेकच खरा आधार' असल्याचं दाखवून दिलं आहे.
कर्नलवाडी येथील रहिवासी सुभाष दादासाहेब निगडे यांचं अकस्मात निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी आणि एकुलती एक मुलगी उत्कर्षा असा परिवार आहे. वडिलांच्या निधनाने दुःखाचा डोंगर कोसळला असतानाही उत्कर्षाने धैर्य न गमावता स्वतः अंत्यविधी करण्याचा मोठा निर्णय घेतला.
परंपरेनुसार हिंदू धर्मात अंत्यविधी मुलाकडून केला जातो. मात्र निगडे कुटुंबीयांनी समाजासमोर नवा विचार ठेवत मुलगीच वडिलांचा अंत्यविधी करणार असा निर्णय घेतला. या निर्णयामुळे स्त्री-पुरुष समानतेचा ठोस संदेश समाजात गेला आहे.
बारामती येथील वैकुंठ स्मशानभूमीत उत्कर्षाने अत्यंत शांतपणे आणि धैर्याने सर्व विधी पूर्ण केले. “माझ्या वडिलांनी मला कधीच मुलापेक्षा कमी मानलं नाही, त्यामुळे त्यांच्या शेवटच्या प्रवासात कर्तव्य पार पाडणं हा माझा हक्क आहे,” अशी भावना उत्कर्षाने व्यक्त केली.
उत्कर्षाच्या या निर्णयामागे कुटुंबीयांचा पूर्ण पाठिंबा होता. कठीण प्रसंगातही मुलीला दिलेला हा आधार समाजासाठी प्रेरणादायी ठरला आहे.
ही घटना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नसून समाजाला दिशा देणारी आहे. 21व्या शतकात स्त्री-पुरुष समानता केवळ बोलण्यात नाही, तर कृतीतूनही दिसून येते, हे कर्नलवाडीच्या या लेकीने सिद्ध करून दाखवले.
ही बातमी वाचा: