मध्य पूर्वेत महिन्याभरापेक्षा जास्त काळापासून सुरु असलेल्या युद्धावर अखेर तोडगा दृष्टीपथात आलाय. कालपर्यंत असं वाटतं होतं की, हे युद्ध अजून भीषण होईल. कारण इराण माघार घ्यायला तयार नव्हता. अखेर आज डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेली डेडलाईन संपायला अवघा एक तास उरलेला असताना सीजफायरची घोषणा झाली. सगळ्या जगासाठी ही चांगली बातमी आहे. कारण या युद्धामुळे तेल संकट वाढत चाललेलं. काही देशांमध्ये लॉकडाऊन सारख्या उपायोजना कराव्या लागलेल्या. वेळेवर एलपीजी मिळत नसल्याने अनेकांच्या उद्योग, व्यवसायावर परिणाम होऊ लागलेला. अन्य देशांच्या तुलनेत भारताकडे रिझर्व्ह साठा जास्त असल्याने फार मोठी झळ बसली नाही. पण हे युद्ध असचं चालू राहिलं असतं तर स्थिती अजून भीषण होत गेली असती. युद्ध थांबलं ही भारत आणि संपूर्ण जगासाठी चांगली बातमी आहेच.
पण अनेक भारतीयांना प्रश्न पडला आहे की, पाकिस्तानला मध्यस्थीच श्रेय कसं मिळालं? पाकिस्तानची स्वत:ची आर्थिक स्थिती खराब आहे. त्यांना तालिबान सोबतच्या संघर्षावर तोडगा काढण्यासाठी दुसऱ्या देशांमध्ये जावं लागतं. मग अमेरिका, इस्त्रायल, इराण इतक्या मोठ्या देशांमध्ये पाकिस्तान कशी काय मध्यस्थी करु शकतो. इराण-अमेरिका युद्ध सुरु होण्याआधी ओमानमध्ये मध्यस्थीच्या बैठका झालेल्या. आखातमध्ये अनेक श्रीमंत देश आहेत. ते सोडून पाकिस्तानच का? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पाकिस्तानला इतकं का मोठं करतायत? त्यामागे त्यांचा काय हेतू आहे?.
मध्यस्थीची संधी देण्याचं पहिलं कारण?
एक म्हणजे लाळघोटे, हाजाहाजी करणारे लोक डोनाल्ड ट्रम्प यांना विशेष आवडतात. ऑपरेशन सिंदूरनंतर तुम्ही पाकिस्तानी लष्करप्रमुख आसिम मुनीर आणि पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांचं वागणं बघितल तर त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना खुश करण्याची एकही संधी सोडली नाही. डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार दिला पाहिजे ही पहिली मागणी करणारे हे दोघेच आहेत. आज युरोपसह जगातील अनेक देशांसोबत ट्रम्प यांनी अमेरिकेचे संबंध बिघडवून ठेवले आहेत. युद्धकाळात ट्रम्प यांच्यावर मायदेशात टीका सुरु होती. त्यांना काहींनी वेड ठरवलं. सौदीच्या क्राऊन प्रिन्सला ट्रम्प वाट्टेल ते बोलले. पण मुनीर आणि शरीफ हे दोनच असे व्यक्ती आहेत जे सतत ट्रम्प किती बरोबर आहेत हे सांगत असतात. पाकिस्तानला मध्यस्थीची संधी देण्याचं हे एक कारण झालं.
दुसरं कारण
ट्रम्प यांच्या डोक्यात कदाचित भारतासोबतचा हिशोब चुकता करणं हे दुसरं कारण असू शकतं. म्हणून ते पाकिस्तानला मोठं करत असावेत. कारण अमेरिका-इराण मधस्थीची चर्चा पाकिस्तानात होणार आहे. यामुळे जगभरात पाकिस्तानला स्वत:ची वाहवा करण्याची संधी मिळणार आहे. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी ट्रम्प जे म्हणतील त्याला पाकिस्तान नुसता मम एवढच म्हणत होता. पण भारताने अजिबात तसं केलं नाही. ऑपरेशन सिंदूरच्यावेळी ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तान सीजफायरच श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. पण भारताने ठामपणे नाही म्हटलं. आजही भारताची तीच भूमिका कायम आहे. पण पाकिस्तान ट्रम्प यांच्यासमोर झुकला. एक मजबूत राष्ट्राची जी भूमिका असते तेच भारताने केलं. भारत-पाकिस्तानने मिळून शस्त्रसंधी केली. त्यात अमेरिकेची काही भूमिका नाही ही सुरुवातीपासूनच भारताची भूमिका आहे. पाकिस्तानला मध्यस्थीच श्रेय मिळत असल्याने भारतात मोदी सरकारवर टीका सुरु आहे. पाकिस्तानचा वापर करुन असाही हिशोब चुकता करण्याची त्यांनी आयती संधी मिळाली. ती ते साधून घेतायत.