परभणी: परभणी-जिंतूर मार्गावरील लोअर दूधना डावा कालव्याजवळ मंगळवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास एक हृदयद्रावक घटना घडली. भरधाव कारने दुचाकीला दिलेल्या भीषण धडकेत हिंगोली जिल्ह्यातील सख्या बहीण-भावाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात आणि त्यांच्या मूळ गावी शोककळा पसरली आहे.
बी.टेक प्रवेशासाठी आले अन् काळाने घाला घातला
मिळालेल्या माहितीनुसार, शीतल महादेव व्यवहारे (२३) आणि राम महादेव व्यवहारे (२१) (रा. वटकळी, ता. सेनगाव, जि. हिंगोली) हे दोघे परभणी येथे बी.टेक द्वितीय वर्षाच्या प्रवेशा संदर्भात कामासाठी आले होते. काम आटोपून आपल्या दुचाकीवरून (MH 38 T 2231) ते जिंतूरच्या दिशेने जात असताना, समोरून येणाऱ्या कार (HR 26 DF 7890) चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. ही कार थेट दुचाकीवर आदळल्याने हा भीषण अपघात झाला.
अपघाताची भीषणता आणि मदतकार्य
धडक इतकी जोरदार होती की, शीतल आणि राम या दोघांचाही घटनास्थळीच प्राण गेला. घटनेची माहिती मिळताच झरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका चालक दिनेश बिरगड यांच्यासह ग्रामस्थांनी मदतीसाठी धाव घेतली. दोघांनाही तातडीने परभणी येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.
कार चालक फरार, पोलिसांकडून तपास सुरू
अपघातानंतर कार चालक आपले वाहन सोडून घटनास्थळावरून पसार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे सपोनि. जीवन राजगुरू, सपोनि. आडके आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. परभणी ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून फरार चालकाचा शोध घेतला जात आहे.
दोन तरुण मुलांचा असा अचानक आणि अपघाती अंत झाल्याने वटकळी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.