बारामतीत 6 उमेदवारांचे अर्ज मागे, राहुरीतही चौघांची माघार; शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी घडणार
Marathi April 08, 2026 10:25 PM

मुंबई : राज्याचं लक्ष लागलेल्या बारामती (Baramati) पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा उद्या शेवट दिवस आहे. मात्र, काँग्रेसने कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, अशी भूमिका घेतल्याने बारामतीत पोटनिवडणूक होणार, मतदान होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. तरीही उद्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दिवशी आणखी काही घडामोडी घडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. त्यातच, आज बारामतीच्या पोटनिवडणुकीत (Byelection) 6 उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतले आहेत. दुसरीकडे अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी (Rahuri) विधानसभा मतदारसंघातून आज 4 उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याची माहिती आहे.

बारामती पोटनिवडणुकीमध्ये आजच्या दिवशी सहा जणांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत, अंतिम आकडेवारी यायला वेळ लागणार असून अद्याप दुपारी 5 वाजेपर्यंत कार्यालयीन प्रक्रिया सुरु होती. त्यामुळे, आज आणखी किती उमेदवार अर्ज माघारी घेतात हे उशिरा कळणार आहे. अर्ज माघारी घेण्याचा उद्या शेवटचा दिवस असणार आहे, त्यामुळे बारामतीत उद्या मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात. येथे एकूण 53 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते, त्यातील सहा जणांनी आत्तापर्यंत माघार घेतले आहे. त्यामुळे, सध्या 47 उमेदवार रिंगणार आहेत. तर, अहिल्यानगरमध्ये 18 उमेदवार रिंगणात उरले आहेत. दरम्यान, बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांनी अर्ज भरला असून त्यांच्याविरुद्ध काँग्रेसने उमेदवार दिला आहे. काँग्रेसने आकाश मोरे यांना तिकीट दिलं असून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.

राहुरीत 4 जणांचे अर्ज माघारी

अहिल्यानगरच्या राहुरी पोटनिवडणुकीच्या उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या दुसऱ्या दिवशी चार उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले आहेत. त्यामुळे 18 उमेदवारी अर्ज शिल्लक राहिले आहेत, उद्या गुरुवारी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे, मोठ्या राजकीय हालचाली घडू शकतात. महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दोन अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तर मविआतील ठाकरे सेनेचे जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यामुळे, या उमेदवारांचा नेमका काय निर्णय होतो ते देखील पाहावं लागेल. मात्र, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून येथे उमेदवार देण्यात आला आहे. त्यामुळे, भाजप महायुतीचे अक्षय कर्डीले विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे गोविंदराव मोकाटे यांच्यात थेट लढत होणार आहे.

दरम्यान, बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांविरोधात तब्बल सध्या 47 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र, भाजप सुनेत्रा पवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची यांनी दिली.

जनता काँग्रेसला माफ करणार नाही

स्वर्गीय माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती मतदारसंघात पोटनिवडणूक पार पडत आहे. त्यासाठी सुनेत्रा पवार यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी सर्वपक्षीयांकडून प्रयत्न सुरू असताना काँग्रेसने उमेदवारी अर्ज भरल्यानंतर भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. काँग्रेसची ही कृती निंदनीय असून अजित दादांनी काँग्रेस सरकारमध्ये राहून त्यांची महाराष्ट्रात ताकद वाढवली होती. मात्र, काँग्रेसची ही कृती आणि त्यांची झालेली अधोगती याला अनेक कारणे आहेत. महाराष्ट्रातील जनता काँग्रेसला कधीच माफ करणार नाही, असे नितेश राणेंनी म्हटलं.

हेही वाचा

विधिमंडळात गाजलेल्या सातारा झेडपी अध्यक्षांच्या अडचणीत वाढ; कुणबी प्रमाणपत्र बेकायदेशीर, घाईघाईत बनवलं, याचिका दाखल

आणखी वाचा

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.