Apurva Nemlekar Tanuj Gowalkar Love Story: मराठी मनोरंजन विश्वातील (Marathi Entertainment World) सेलिब्रिटींची लगीनघाई सुरू आहे. अनेकांनी आपल्या साताजन्माच्या गाठी बांधून नव्या आयुष्याला सुरुवात केलीय. तर अजुनही अनेक सेलिब्रिटी आपल्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत. अशातच नुकतीच 'रात्रीस खेळ चाले' (Ratris Khel Chale) फेम शेवंतानं आपली लग्नगाठ बांधली आहे. अपूर्वा नेमळेकरनं (Apurva Nemlekar) सोशल मीडियावर पोस्ट करुन चाहत्यांना सुखद धक्काच दिला. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Marathi Actress Apurva Nemlekar) हिने 14 फेब्रुवारी 2026 रोजी तनुज गोवळकरसोबत (Tanuj Govalkar) विवाह केला. अशातच लग्नानंतर दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना अपूर्वानं आपल्या लव्हस्टोरीबाबत सांगितलं आहे.
'रात्रीस खेळ चाले' फेम अपूर्वा नेमळेकरनं व्हेलेंटाईन डेच्या दिवशी म्हणजेच, 14 फेब्रुवारी रोजी तनुज गोवळकरसोबत आपली लग्नगाठ बांधली. अपूर्वाचं हे दुसरं लग्न आहे. अपूर्वानं इन्स्टाग्रामवरुन फोटो पोस्ट करुन सर्वांसोबत गूड न्यूज शेअर केलेली. पण, तेव्हापासूनच चाहत्यांच्या मनात प्रश्न होते की, अपूर्वा आणि तनुज नेमके भेटले कुठे? एकमेकांच्या प्रेमात पडले कसे? दोघांची लव्हस्टोरी कशी सुरू झाली? चाहत्यांच्या मनातील या सर्व प्रश्नांवर आता स्वतः अपूर्वा नेमळेकरनं मौन सोडलं आहे.
'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखतीत अपूर्वा नेमळेकरनं सांगितलं की, "मला माझ्या क्षेत्रातला मुलगा नको होता. गेली 15 वर्ष खूप काम केल्यानं आता आयुष्यात शांतता असावी अशी माझी अपेक्षा आहे, म्हणूनच या इंडस्ट्रीतला कुणी नको हवा होता. मला मॅट्रिमोनी साईटशिवाय काही पर्याय नव्हता. त्यावर मी रीतसर नाव नोंदवलं, त्यावरून मी अनेकांना भेटलेसुद्धा. त्यांना भेटल्यानंतर मला जाणवायचं की, लग्न करणं खरंच गरजेचं आहे का? मी अक्षरश: कंटाळले होते. त्यानंतर मी ठरवलं की, माझ्या आयुष्यात ज्याला यायचं आहे तो येईल..."
View this post on Instagram
"शेवटी कंटाळून मी नंतर मॅट्रिमोनी साईट अक्षरश: गेम खेळल्यासारखं पहायला लागले. तेव्हा माझी भाची अधिकानं एकेदिवशी मला विचारलं की, 'तू काय करतेयस?' तर मी तिला म्हटलं की, 'हा एक गेम आहे, इथे नवरा मिळतो...' त्यावर ती म्हणाली, 'मी शोधते तुझ्यासाठी नवरा...' तेव्हा एक मुलगा डॉक्टर होता, त्याला बघून अधिका म्हणाली, 'हा डॉक्टर आहे, नको नको, हा तुला वेळ नाही देऊ शकणार. हा पेशंटकडे लक्ष देईल की, तुला वेळ देईल. हा नको' नंतर मग एक मुलगा होता. त्याचा गिटार वाजवतानाचा फोटो होता. तो फोटो बघून ती म्हणाली, 'हा नको, हा बाजापेटी वाजवत बसेल, तर तू वैतागून जाशील...' ती जे काही बोलत होती, त्याला मी मस्करीतच घेत होते...", असं अपूर्वा नेमळेकर म्हणाली.
पुढे बोलताना अपूर्वानं सांगितलं की, "त्यानंतर तिसरा फोटो होता तो तनुजचा होता. त्यात त्यानं ब्लेझर घातलेला फोटो होता. ते बघून अधिका म्हणाली, 'हा मुलगा खूप छान वाटतोय...' तिनं तेव्हा लगेच तनुजला रिक्वेस्ट पाठवली. मग मी तनुजचे फोटो वगैरे पाहिले. पुढे तनुजकडूनही रिप्लाय आला आणि आम्ही बोलायला लागलो. अधिका पुढच्या दिवशी पुण्याला गेली. त्याच्याच पुढच्या दिवशी आम्ही भेटलो. त्यामुळे आमच्या एकत्र येण्यामागे माझी भाची महत्त्वाची व्यक्ती आहे. आम्ही खूप वेळ गप्पा मारत होतो. घरी आल्यानंतर मी आईला तनुजबद्दल सांगितलं आणि मला त्याच्यासोबत लग्न करायचं असल्याचंही सांगितलं..."
"माझा लग्नसंस्थेवर विश्वास आहे. माझ्या आई-बाबांनी 36 वर्षांचा संसार केलाय, त्यात ते कधीच भांडले नाहीत. एखाद्या व्यक्तीमुळे लग्न टिकलं नाही, तर लग्न वाईट आहे, असं म्हणणं चुकीचं आहे. त्यामुळे मला आयुष्याला आणखी एक संधी द्यायची होती. यात मला घाई करायची नव्हती. 9 वर्षात मी अनेक मुलांना भेटले. घरच्यांनी आणि नातेवाईकांनी सुचवलेले, वधू-वर सूचक संकेतस्थळांवरून सुचवलेल्या अशा अनेक मुलांशी मी बोलले... यात मला माझ्या अपेक्षेप्रमाणे कुणीच मिळत नव्हता. त्यामुळे खूप वेळ जात होता, पण तरी मी पॉजिटीव्ह होते. तीच वाट बघितल्यानं तनुज माझ्या आयुष्यात आला असं मी म्हणेन...", असं अपूर्वानं पुढे सांगितलं.
"इतक्या लोकांसोबत बोललीये मी, त्यामुळे मला भीती वाटायची. त्यामुळे एका पॉईंटला मी सगळं थांबवलं. सगळ्यात पहिले मराठी मुलगा असावा आणि तो डिव्होर्सी असावा या माझ्या अपेक्षा होत्या... मला खूप जणांनी विचारलं लग्नासाठी पण मी त्यांना नकार दिला. कारण, ज्या व्यक्तीनं त्या दुःखाची चवच नाही घेतली, त्याला माझं दुःख नाही समजणार... तनुज छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये माझा विचार करतो...", असं अपूर्वा नेमळेकर म्हणाली.