गणपतीपाडा येथील बंद कंपनीत आग
esakal April 15, 2026 09:45 PM

तुर्भे, ता. १५ (बातमीदार) : गणपतीपाडा परिसरातील एका बंद पडलेल्या कंपनीत बुधवारी (ता. १५) भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वी एमआयडीसीकडून कारवाई होऊनही संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणात भंगार साहित्य पडून असल्यानेच ही आग भडकली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

गणपतीपाडा परिसरातील बंद कंपनीच्या आवारात भंगाराचा मोठा साठा ठेवण्यात आला होता. हा साठा एका भंगार व्यावसायिकाचा असल्याचे सांगितले जात आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास अचानक या भंगाराला आग लागली आणि काही वेळातच आगीने भीषण रूप धारण केले. प्लॅस्टिक, रबर आणि इतर ज्वलनशील पदार्थ मोठ्या प्रमाणात असल्यामुळे आग वेगाने पसरली.
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तत्काळ घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. जवानांनी युद्धपातळीवर प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम हाती घेतले. धुराचे मोठे लोट आकाशात पसरल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, आगीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घटनास्थळी गर्दी केली होती. स्थानिकांकडून प्रशासनाच्या निष्काळजीवर संताप व्यक्त केला जात आहे. एमआयडीसीकडून यापूर्वीच कारवाई करूनही भंगार हटविण्यात आले नाही, असा संताप नागरिकांनी व्यक्त केला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.