‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानात सहभागी व्हा
प्रभारी सरपंच प्रमोद पाटील यांचे ग्रामस्थांना आवाहन
विक्रमगड, ता. १५ (बातमीदार) : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने १८ फेब्रुवारी २०२६ला ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानाचा शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश प्रत्येक गाव निरोगी, जागरूक व सशक्त बनविण्याचा असून, ग्रामस्थांनी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन ग्रुप ग्रामपंचायत आलोंडे येथे झालेल्या ग्रामसभेत प्रभारी सरपंच प्रमोद पाटील यांनी केले आहे.
या ग्रामसभेस ग्रामपंचायत अधिकारी विजय बिल्लेवार, तंटामुक्त अध्यक्ष मिठाराम भोईर, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका व ग्रामस्थ उपस्थित होते. हे अभियान १ एप्रिल २०२६ पासून सुरू झाले असून, या अभियानातील यश आपल्यासारख्या ग्रामप्रमुखांच्या व ग्रामस्थांच्या नेतृत्वावर अवलंबून आहे. तसेच उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायतींना जिल्हा, विभाग राज्य स्तरावर आकर्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. ग्रामसभेत या अभियानासाठी गाव पातळीवर सरपंच (अध्यक्ष), उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, पत्रकार, ग्रामपंचायत कर्मचारी, आशा, अंगणवाडी सेविका, शिक्षक प्रतिनिधी यांची समिती स्थापन केली असून, या समितीची बैठक दर महिन्याला घेण्यात येणार आहे.