RCB vs LSG: आयपीएल स्पर्धेत 2017 नंतर भुवनेश्वर कुमारने केला असा कारनामा, डाव संपल्यानंतर म्हणाला..
GH News April 16, 2026 01:11 AM

आयपीएल 2026 स्पर्धेतील 23व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा वरचष्मा दिसला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनौ सुपर जायंट्सला 146 धावांवर रोखलं. यात भुवनेश्वर कुमार आणि रसिख सलाम दार यांचं योगदान महत्त्वाचं ठरलं. या दोघांनी मिळून लखनौ सुपर जायंट्सचे 7 विकेट काढले. रसिख सलाम दार याने 4 षटकात 24 धावा देत 4 गडी बाद केले. तर भुवनेश्वर कुमारने 4 षटकात 27 धावा देत 3 गडी बाद केले. भुवनेश्वर कुमार या स्पर्धेत दोन वेळा 3 गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. चेन्नई सुपर किंग्सविरुद्धच्या सामन्यात 41 धावांवर 3 गडी बाद केले होते. आता लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा 3 बळी घेण्यात यश मिळवलं. याआधी भुवनेश्वर कुमारने एकाच पर्वात दोनदा तीन बळी घेण्याची कामगिरी आयपीएल 2017 मध्ये केली होती. आठ वर्षानंतर भुवनेश्वर कुमारला एकाच पर्वात दोन वेळा 3 गडी बाद करण्याची किमया साधता आली आहे.

भुवनेश्वर कुमारने या कामगिरीनंतर आपल्या भावना व्यक्त केल्या. भुवनेश्वर कुमारने आरसीबीच्या गोलंदाजीबाबत म्हणाला की, याचे श्रेय सर्व गोलंदाजांना जाते, फक्त एका गोलंदाजाला देता येणार नाही, तर प्रत्येकाचा वैयक्तिक अनुभव आणि आम्ही आखलेली योजना या गोष्टींनाही महत्त्व आहे. त्यामुळे, हे चांगलं झालं आहे.’ भुवनेश्वर कुमारला डावा हात कसा आहे? याबाबत विचारलं असता म्हणाला, गोलंदाजीसाठी पुरेसा चांगला आहे, पण क्षेत्ररक्षणासाठी नाही.

आरसीबीच्या क्षेत्ररक्षणाचं कौतुक करत भुवनेश्वर कुमार म्हणाला की, चिन्नास्वामीमध्ये संघाला बाद करायचे असेल तर अशा प्रकारची झेल पकडण्याची गरज असते. सॉल्ट आणि टिम या दोघांनीही घेतलेले झेल अप्रतिम होते. मला वाटतं, त्यामुळेच आम्ही त्यांना 150 धावांच्या आत बाद करू शकलो.’

आयपीएलसाठी सुपर फिट असण्याबद्दल भुवनेश्वर कुमार म्हणाला की, मला वाटतं, मी एका उत्तम वाइनप्रमाणे वृद्ध होत आहे, त्यामुळे मी एवढंच म्हणू शकतो. चांगली गोष्ट ही आहे की आयपीएलमधून परतल्यावर मला खूप वेळ मिळतो. त्यामुळे मला ताकद मिळवायला आणि थोडी विश्रांती घ्यायला मदत होते. मला वाटतं, माझ्या बाबतीत ही एक चांगली गोष्ट घडत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.