नारी शक्ती विधेयकावर वादळी चर्चा, अरविंद सावंत आक्रमक, संसदेत नेमकं काय घडलं?
Tv9 Marathi April 16, 2026 09:46 PM

नारी शक्ती वंदन हे महिला आरक्षणविषयक दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यासाठी केंद्र सरकारने विशेष अधिवेशन बोलावले आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे आरक्षणविषयक दुरुस्ती विधेयक आणण्यामागे सरकारची नेमकी भूमिका काय आहे? याबाबत माहिती दिली, तसेच त्यांनी यावेळी विरोधकांवर देखील हल्लाबोल केला. विरोधकांचा या विधेयकाला विरोध असल्याचं त्यांनी म्हटलं. दरम्यान त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी या विधेयकांवर आपलं मत मांडलं.

नेमकं काय म्हणाले सावंत?

आज महिला शक्ती नारी वंदन बिलवर चर्चा होत आहे. हे मी माझं सौभाग्य समजतो की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर मला लगेचच बोलण्याची संधी मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विधेयकाबाबत माहिती दिली, तेव्हा त्यांनी एक शब्द प्रयोग केला. सैधांतिक आणि राजनैतिक. जर हे राजनैतिक नाहीये तर सैधांतिक असेल तर इथे बसलेल्या सर्व विरोधकांचा महिला आरक्षणाला विरोध आहे, असाच समज होईल. महिला आरक्षणाचं बील तर 2023 मध्येच पास झालं आहे. त्यावेळी कोणी विरोध केला होता? मग तुम्ही आता असं का म्हणत आहात की विरोधक महिला आरक्षणाच्या विधेयकाला विरोध करत आहेत म्हणून? असा सवाल यावेळी सावंत यांनी केला आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, इथे अनेक महिला भगिनी उपस्थित आहेत, त्यांच्यासमोर सांगण्यात आलं की आम्ही महिला आरक्षणाच्या विरोधात आहोत. अध्यक्ष मोहदय आम्ही महाराष्ट्रातून येतो. हाराष्ट्राचा इतिहास सर्वांना माहीत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई राजमाता जिजाऊ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर संस्कार केले. जिजाऊंच्या संस्कारातून स्वराज्य उभं राहिलं. त्यांनी कधीही दुटप्पी भूमिका घेतली नाही. महिलांचा अपमान झाला तर शिवाजी महाराज थेट दोषी व्यक्तीचा चौरंगा करायचे. त्याचे हात पाय तोडून टाकायचे. हा महाराजांचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रात कोणा-कोणाचा जन्म झाला, झाशीची रानी, अहिल्याबाई होळकर, तारारानी या सर्वांचा जन्म महाराष्ट्रात झाला आहे. मग आम्ही महिला आरक्षणाला विरोध का करणार? असा सवाल यावेळी अरविंद सावंत यांनी केला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.