अकोला देशातील सर्वात उष्ण शहर, तापमानाचा पारा 44 अंशावर, शिक्षण विभागाचा मोठा निर्णय
उमेश अलोणे, एबीपी माझा April 17, 2026 12:13 AM

Akola Temperature News :  राज्यातील तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राज्याच्या अनेक भागात तापमानाचा पारा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील अकोला शहर हे देशातील सर्वात उष्ण शहर ठरलं आहे. तिथे तापमानाचा पारा 44 अंशावर गेला आहे. अशातच शिक्षण विभागानं मोठा निर्णय घेतला आहे. शाळांच्या वेळामध्ये बदल करण्यात आला आहे. 

अकोला जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळं शैक्षणिक संस्थांच्या वेळांमध्ये बदल 

अकोला जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळं शैक्षणिक संस्थांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. आता अकोल्यात सकाळी 11 वाजेपर्यंत राहणार शाळा सुरु राहणार आहेत. प्राथमिक शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार यांनी असे, आदेश दिले आहेत. उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची गंभीर दखल घेत शैक्षणिक संस्थांच्या वेळांमध्ये तातडीने बदल करण्याची सूचना बजावल्या आहेत. सर्व शाळा सकाळी 11 वाजेपर्यंत भरवण्यात याव्यात. त्यानंतर शाळा सुरु ठेवल्यास संबंधित शाळेवर प्रशासकीय तथा दंडात्मक कार्यवाही करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी सूचित केले आहे, असेही आदेशमध्ये नमूद केले आहे.

अकोल्यात तापमानाचे दररोज नवनवे उच्चांक

अकोल्यात आजही कालच्या इतक्याच 44.2 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. कालचं आणि आजचं हे तापमान  या मोसमातील सर्वाधिक तापमान आहे. अकोल्याचा आजचा पारा 44. 2 अंशांवर पोहोचलाय. अकोल्यात तापमानाचे दररोज नवनवे उच्चांक पाहायला मिळतायेत. परवा 44 काल 44.2 आणि आजही तापमानाने 44.2 चा टप्पा गाठलाय.  दुपारच्या वेळी अकोल्याच्या रस्त्यांवर उन्हामुळे संचारबंदी सदृश्य परिस्थिती पहायला मिळतीये. पुढचे काही दिवस अकोल्यात तापमानाचे अनेक नवे उच्चांक होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली जातीये.

भंडाऱ्याचा पारा दुसऱ्या दिवशीही 42 अंशावर

हवामान विभागानं पुढील  काही दिवस प्रखर उष्णता राहण्याचे संकेत दिले आहे. भंडाऱ्याचं कालचं तापमान 42 अंश होतं. सलग दुसऱ्या दिवशी आज भंडाऱ्याचं तापमान 42 अंश असल्याची नोंद करण्यात आली. प्रखर उष्णता राहणार असल्यानं नागरिकांनी घराबाहेर पडू नये, आणि अती महत्वाचे काम असल्यास स्वतःच्या आरोग्याची काळजी घेऊन कामासाठी घराबाहेर पडण्याचे आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे. चटके जाणवणाऱ्या कडाक्याच्या उन्हापासून वाचण्यासाठी नागरिकांनी स्कार्फ, रुमाल, गॉगल्स, दुपट्टा याचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.


राज्यातील काही शहरांमधील तापमान - 

परभणी - ४२ 
संभाजीनगर - ४१.४ 
सांगली - ३९.५
सातारा - ४१.२ 
पुणे - ३९.७ 
मालेगाव - ४३.४ 
बारामती - ४०.५ 
जळगाव - ४१.५ 
कोल्हापूर - ३८.१ 
नाशिक - ३७.५ 
सोलापूर - ४३.४

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.