Monsoon Update : महाराष्ट्रात यंदा पावसाचं प्रमाण कसं राहणार? IMD चा थरकाप उडवणारा पहिला अंदाज, घाम फोडणारी बातमी
Tv9 Marathi April 18, 2026 09:45 PM

भारत हा कृषीप्रधान देश आहे. परंतु भारतामधील जवळपास 70 ते 80 टक्के शेती ही पावसाच्या पाण्यावरच अवलंबून आहे. त्यामुळे देशात मान्सूनचं प्रमाण कसं राहतं, त्यावर शेतीचं भवितव्य अवलंबून असतं. गेल्या वर्षी देशासह राज्यात वेळेपूर्वीच मान्सून दाखल झाला होता. अनेक भागांमध्ये अतिवृष्टी झाली यामुळे शेतीला मोठा फटका बसला. शेतीसह अनेक गावांवर देखील पुराच्या पाण्यामुळे स्थलांतरणाची वेळ आली होती. तर काही वर्षी देशात पावसाचं प्रमाण हे अत्यल्प राहतं, त्याचा देशील शेतीला मोठा फटका बसतो. दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होते. दरम्यान यंदा देशात पावसाचं प्रमाण कसं राहणार? मान्सूनची एन्ट्री कधी होणार याबाबत भारतीय हवामान विभाग (IMD) चा पहिला अंदाज समोर आला आहे. या अंदाजामुळे झोप उडाली आहे.

यावर्षी मान्सूनवर ‘अल निनोचा’ प्रभाव राहील असं भाकीत भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलं आहे. मान्सूनवरील अल निनोच्या प्रभावामुळे हवामान विभागाकडून देखील चिंता व्यक्त करण्यात आली आहे. यंदा मान्सूनवर अल निनोचा प्रभाव राहणार असल्यानं सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार प्रशांत महासागरच्या काही भागामध्ये अल निनो तयार होत आहे. याचा परिणाम म्हणजे सध्या देशभरात उष्णतेची लाट पहायला मिळत आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान हे 41 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचलं आहे. विदर्भात तर उष्णतेची लाट पहायला मिळत आहे. याचा फटका हा मान्सूनला बसण्याची शक्यता आहे.

काय आहे भारतीय हवामान विभागाचा अंदाज?

भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार यावर्षीच्या मान्सूनवर अल निनोचा प्रभाव राहणार असून, जून ते सप्टेंबर या काळात पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागरच्या काही भागामध्ये अल निनो तयार होत आहे. ज्याचा फटका हा केवळ भारतालाच नाही बसणार तर जगभरातील अनेक देशांना बसू शकतो असा अंदाज देखील वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्रात देखील यंदा पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.