नाशिकमध्ये टीसीएस कंपनीतील धार्मिक भावना दुखावल्याचे, धर्मांतराचा प्रयत्न केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाचे आमिष, अत्याचार आणि 'गजवा-ए-हिंद' च्या नावाखाली धर्मांतराचा प्रयत्न केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला. संशयित तंजीर इनामदार (लासलगाव) यास अटक करण्यात आली.
पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला २२ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. धर्मांतराच्या प्रयत्नाच्या या प्रकाराबाबत पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार पीडित तरुणी आणि संशयित तंजीर इनामदार यांची ओळख जून २०२४ मध्ये झाली होती. तेव्हापासून जवळीक वाढवत संशयिताने जानेवारी २०२६ पर्यंत विविध ठिकाणी छळ केला. तिला बळजबरीने मिठी मारणे, 'लव्ह बाइट'च्या नावाखाली शरीरावर जखमा करणे आणि तिची अश्लील छायाचित्रे काढण्याचे कृत्य केले. इतकेच नव्हे, तर पीडितेवर सिगारेट पिण्यासाठीही दबाव टाकण्यात येत होता.
परप्रांतीय ट्रेनमध्ये, कन्फर्म तिकिटासह मराठी माणूस प्लॅटफॉर्मवर; TC, रेल्वे प्रशासन, पोलीस अन् सरकार सगळेच झोपेतजानेवारी २०२६ मध्ये संशयिताने पीडितेची छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी दिली. या धमकीच्या जोरावर त्याने तिला पेठ रस्त्यावरील आरटीओ कार्यालयासमोरील एका लॉजमध्ये नेले. तिथे तिला बळजबरीने मद्य पाजले. ती नशेत असताना तिच्यावर अत्याचार केला. अत्याचारानंतर संशयित तंजीर याने पीडितेच्या गळ्यातील तुळशी माळ आणि हातातील धार्मिक धागे बळजबरीने काढून टाकले. 'मला तुझ्याबरोबर मुस्लिम रिवाजाप्रमाणे 'गजवा- ए- हिंद' करायचे आहे, असे म्हणत त्याने पीडितेवर धर्मांतरासाठी दबाव टाकल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पीडितेने कैफीयत मांडल्यावर घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलिस आयुक्त शेखर देशमुख आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी तातडीने गुन्हा नोंदवून तपासाची चक्रे फिरवत संशयित तंजीर इनामदार (लासलगाव) यास ताब्यात घेतले आहे. पोलिस निरीक्षक (प्रशासन) ज्योती आमणे तपास करीत आहेत.
धर्मांतर खपवून घेतले जाणार नाही : मुख्यमंत्रीराज्यात धर्मांतराचा प्रकार कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतला जाणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी स्पष्ट केले. नाशिक धर्मातर प्रकरणासंदर्भात गृह विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत पोलिस विभागाला अनेक महत्त्वाचे निर्देश देण्यात आले.
या बैठकीला पोलीस महासंचालक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, 'एसआयटी'चे प्रमुख आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. धर्मांतराची प्रकरणे कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाहीत, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक पोलिसांनी स्वतःहून हे प्रकरण उघडकीस आणल्याबद्दल त्यांचे कौतुक केले.