'अभियांत्रिकी'ची ३० एप्रिलपासून परीक्षा! उन्हामुळे विद्यापीठाने केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकांसाठी काढले परिपत्रक; परीक्षार्थींना केंद्रांवर मिळणार 'या' सुविधा
esakal April 20, 2026 04:45 AM

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची अंतिम सत्र परीक्षा सध्या सुरु आहे. ३० एप्रिलपासून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु होत आहे. उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असल्याने विद्यापीठाने परीक्षा केंद्रांना व परीक्षार्थींनी नेमकी काय काळजी घ्यावी, यासंदर्भातील ‘एसओपी’ तथा नियमावली तयार केली आहे. यात प्रत्येक परीक्षार्थींची केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकांनी काळजी घ्यावी, असे म्हटले आहे.

सोलापूरमधील तापमान दररोज ४० अंशावर आहे. तापमान वाढल्याने परीक्षार्थींना थकवा जाणवू शकतो. उष्माघाताचा त्रास देखील होऊ शकतो. थकव्याचा परिणाम गुणांच्या टक्केवारीवर होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर त्रास होणाऱ्या विद्यार्थ्यास तातडीने थंड किंवा सावलीच्या ठिकाणी हलवावे. पाणी किंवा ओआरएस द्यावे, कपडे सैल करावेत.

परीक्षा केंद्रांवरील प्रतीक्षा कक्षात त्यांची सोय करावी, पिण्याच्या पाण्यासाठी कोणालाही नकार देऊ नये, अशा सूचना विद्यापीठाने परीक्षा केंद्रांना दिल्या आहेत. अपुरा प्रकाश, वीजेची सोय, पंखे, कुलर नसलेल्या ठिकाणी परीक्षा घेऊ नये, परीक्षार्थींना होणाऱ्या त्रासाची नोंद स्वतंत्र नोंदवहीत ठेवावी, अशाही सूचना विद्यापीठाचे आरोग्याधिकारी डॉ. अभिजीत जगताप, परीक्षा नियंत्रक डॉ. श्रीकांत अंधारे यांनी केंद्रांना केल्या आहेत.

केंद्रप्रमुख व पर्यवेक्षकांना सूचना

  • थकवा जाणवणाऱ्या परीक्षार्थींवर लक्ष ठेवून त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी परवानगी द्यावी.

  • केंद्रावर पंखे, कुलर, वीजेची व्यवस्था असल्याची खात्री करावी, वर्गात हवा खेळती राहवी.

  • परीक्षार्थींना पारदर्शक पिण्याच्या पाण्याची बाटली जवळ ठेवण्यास परवानगी द्यावी.

  • परीक्षा केंद्रांवर प्रथमोपचार कीट ठेवावे, ओआरएस पार्किटे ठेवावीत, जवळील रुग्णालयाचे क्रमांक ठेवावेत.

विद्यार्थ्यांसाठी सूचना अशा...

  • परीक्षेला येताना सैके, सैल व सुती कपडे घालावीत.

  • स्वत:ची पाण्याची बाटली जवळ ठेवावी.

  • उन्हाच्या तडाख्यामुळे वेळेआधी परीक्षा केंद्रावर पोचावे.

  • चक्कर, मळमळ, डोकेदुखी, जास्त घाम येणे, असा त्रास होत असल्यास तातडीने पर्यवेक्षकास कळवावे.

सर्व केंद्रांनी घ्यावी परीक्षार्थींची काळजी

सध्या विद्यापीठाची अंतिम सत्र परीक्षा सुरु आहे. उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत असल्याने परीक्षा केंद्रांनी परीक्षार्थींची खबरदारी कशी घ्यायची, याचे परिपत्रक सर्व केंद्रांना पाठविले आहे. परीक्षा संपल्यानंतर सर्व अभ्यासक्रमांचे निकाल २० ते २५ दिवसांत जाहीर होतील, यादृष्टीने नियोजन केले आहे. ज्या विषयांचे पेपर संपले, त्याच्या उत्तरपत्रिकांची तपासणी देखील सुरु आहे.

- डॉ. श्रीकांत अंधारे, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.