सनरायजर्स हैदराबादचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा याने मिळालेल्या 2 जीवनदानानंतर दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 31 व्या सामन्यात खणखणीत शतक झळकावलं आहे. अभिषेक 135 धावांवर नाबाद परतला. अभिषेकच्या आयपीएल कारकीर्दीतील हे दुसरं तर टी 20 क्रिकेटमधील नववं शतक ठरलं. अभिषेकने राजीव गांधी स्टेडियममध्ये दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई करत शतक पूर्ण केलं. खरंतर दिल्लीच्या खेळाडूंनी चूक केली नसती तर अभिषेकचं अर्धशतकही नसतं झालं. मात्र अभिषेकने दिल्लीच्या खेळाडूंच्या चुकीचा फायदा घेतला. दिल्लीचा विकेटकीपर केएल राहुल आणि नितीश राणा या दोघांनी अभिषेकला जीवनदान दिलं. त्यामुळे दिल्लीला 85 धावांचा फटका बसला. नक्की काय झालं हे जाणून घेऊयात.
दिल्लीचा विकेटकीपर केएल राहुल आणि नितीश राणा या दोघांनी अभिषेकला जीवनदान दिलं. अभिषेकने 9 ओव्हरपर्यंत 49 रन्स केल्या. त्यानतंर अक्षर पटेल याने टाकलेल्या नवव्या ओव्हरमधील पहिल्या चेंडूवर अभिषेकने 1 धावा पूर्ण केली. त्यानंतर अभिषेक दुसरी धाव घेण्यासाठी स्ट्राईक एन्डच्या दिशेने धावला. विकेटकीपर केएलकडे अभिषेकला आऊट करण्याची संधी होती. मात्र केएलने मोठी संधी गमावली. अभिषेकने अशाप्रकारे 204 च्या स्ट्राईक रेटने 25 बॉलमध्ये 51 रन्स पूर्ण केल्या.
अभिषेकने अर्धशतकानंतरही तडाखा कायम ठेवला. अभिषेक फटकेबाजी करत होता. दिल्लीला अभिषेकला आऊट करण्याची संधी मिळाली. मात्र दिल्लीने दुसरी संधीही गमावली. नितीश राणा याने अभिषेक शर्मा 86 धावांवर असताना कॅच सोडली. अभिषेकची कॅच इतकी सोपी नव्हती. मात्र आयपीएल सारख्या स्पर्धेत अशी कॅच घेणं अपेक्षित होतं. नितीशने कॅच सोडल्याने अभिषेकला दुसऱ्यांदा जीवनदान मिळालं.
अभिषेकने त्यानंतर मागे पाहिलं नाही. अभिषेकने नितीश राणा याच्या बॉलिंगवर 15 व्या ओव्हरमधील पहिल्या 2 चेंडूत षटकार लगावले. अभिषेकने यासह शतक पूर्ण केलं. अभिषेकने 47 बॉलमध्ये 9 सिक्स आणि 7 फोरसह शतक पूर्ण केलं.
अभिषेकने शतकानंतरही धावा केल्या मात्र त्याचा वेग मंदावला. हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 2 विकेट्स गमावून 242 धावा केल्या. हैदराबादला इथवर पोहचवण्यात अभिषेकने प्रमुख योगदान दिलं. अभिषेकने 68 चेंडूत नाबाद 135 धावा केल्या. अभिषेकने या दरम्यान 10 चौकार आणि 10 षटकार लगावले.