El Nino Effect: राज्यावर यंदा एल निनोचे संकट घोंगावत आहे. जूनमध्ये हजेरी लावून पावसाला ऑगस्टपर्यंत खंड पड् शकतो, अशी चिन्हे आहेत. म्हणून सरकारने एल निनोशी लढण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जलसंपदा विभागाने राज्यातील सर्वच मनपांना पत्र पाठवून 31 ऑगस्टपर्यंत पाणी पुरवण्यासाठी पाणी जपून वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. 'एल निनो'चा परिणाम शेती, उद्योग आणि बांधकामावर होऊ शकतो. त्या दृष्टीनेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) सूचनेवरून उपाययोजना सुरू झाल्या आहेत. परिणामी भविष्यात कदाचित पाणी कपातीची शक्यता नाकारता येत नाही. (Maharashtra Unseasonal Rain)
दरम्यान, हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा इशारा दिला आहे. रात्रीपासून (21 एप्रिल) जिल्ह्यात पावसाला पूरक वातावरण तयार झाले आहे. तर आगामी काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर मागील 4 दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण असलं तरी अद्याप कुठंही मुसळधार पाऊस झालेला नाही.
सांगली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये मध्यरात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झालाय. यात पलूस तालुक्यातील भिलवडी परिसरामध्ये देखील मध्यरात्री मुसळधार पाऊस झाला. मध्यरात्री झालेल्या पावसाने या भागात शेतात तर काही ठिकाणी पिकात पाणी साचून राहिले आहे. उसाच्या शेतामध्ये पाणी साचून राहिले आहे, तर जोरदार वारा आणि पावसामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे.
धाराशिवमध्ये विजांच्या कडकडाट्यासह गारांचा जोरदार पाऊस; वीज पडून 55 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू
अवकाळी पावसात वीज पडून धाराशिवच्या विठ्ठलवाडी येथील शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. आठ दिवसानंतर ज्या घरात लग्न सोहळा होता, त्या घरात आज दुःखाचा डोंगर आहे. बबन लांडगे असे या शेतकऱ्याच नाव असून शेतात कडब्याची गंज रचायला गेलेले लांडगे यांचा वीज पडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात दोन मुलं व एक मुलगी असा परिवार आहे एकुलत्या एक मुलीचं पुढील आठवड्यात लग्न होत. लग्नाची तयारी ही पूर्ण झाली होती. मात्र त्या अगोदरच वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी; औसा परिसरात गारपीट, आंबा पिकाला फटका
लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावली. औसा शहरासह शिवारामध्ये जोरदार पाऊस पडला असून काही भागांत गारपीटही झाली आहे. अचानक सुरू झालेल्या या पावसामुळे औसा शहरातील जनजीवनावर तात्पुरता परिणाम झाला. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात तापमानाचा पारा 41 ते 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. मात्र नुकत्याच झालेल्या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. लातूर शहर आणि परिसरातील संध्याकाळच्या सुमाराला अतिशय हलक्या पावसाच्या सरी पडून गेल्या आहेत. यावेळी जोरदार वारेही सुरू होते.