भाजपने महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं नाही म्हणून जन आक्रोश मोर्चा काढलेला. त्यावर संजय राऊत म्हणाले की, “मूळात मोर्चाचा हेतू काय, त्यांना माहितीय का? आरक्षण लागू करा ते तुमच्या हातात आहे. 2023 मध्ये महिला आरक्षण कायदा लोकसभेत मंजूर झाला. आता परवाच्या 16 एप्रिलला तुम्ही अध्यादेश काढला. त्यामुळे हे महिला आरक्षण लागू झालेलं आहे. तुम्ही त्याची अंमलबजावणी ताबडतोब सुरु करा. कोणाची ना नाही” “तुम्हाला ट्रम्पला विचारायचं आहे की पुतिनला? आपण देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री आहात. फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहेत. हा अधिकार तुमच्याकडे आहे लागू करण्याचा. कोणत्याही राजकीय पक्षाने, भाजपच्या विरोधकाने 33 टक्के महिला आरक्षण लागू करायला विरोध केलेला नाही. विरोध भाजपचाच आहे” असा दावा संजय राऊत यांनी केला.
“लोकसभेच्या 850 जागा केल्याशिवाय लागू करणार नाही, ही कुठली अट झाली?. लोकसभेच्या 850 जागा कशाला करायला पाहिजेत? लोकसभेच्या 850 जागा झाल्याशिवाय महिला आरक्षण लागू करणार नाही हा काय विषय आहे, कधी आला, कुठल्या घटनेत, संविधानात आहे. 2023 ला कायदा मंजूर झाला, तेव्हा ८५० जागांचा विषयच नव्हता” असं संजय राऊत म्हणाले.
ते फार मोठे आकडे तज्ञ आहेत
“850 जागांचा आकडा खरात बाबाने दिला आहे का? ते फार मोठे आकडे तज्ञ आहेत. मला वाटतं 850 जागांचा आकडा खरात बाबाने दिला आहे. म्हणून ते या आकड्याला पकडून बसले आहेत, नाही तर ते 850 ला चिकटून बसले नसते. 543 मध्ये करा. उलट ते अधिक सोपं आणि सोयीचं आहे. लोकसभेत समतोल राहील” असं संजय राऊत म्हणाले.
महिलांच्या मोर्चात पुरुषच जास्त
“त्यांची ठासलीय लोकांनी. आमची काय ठासतायत ते. काल बघितलं रस्त्यावर काय झालं?. महिलांच्या मोर्चात पुरुषच जास्त होते. महिलांना कळलय. नारी शक्ती त्यांच्या बाजूने अजिबात नाही. ज्यादिवशी 1500 रुपये द्यायचे बंद होतील, त्या दिवशी नारी शक्ती कोणाकडे आहे ते कळेल” असं राऊत म्हणाले.
हा असा जगातला पहिला मोर्चा असेल
“महिला आरक्षणासाठी भाजपने मोर्चा काढणं म्हणजे सत्ताधारी पक्षाने विरोधी पक्षाविरोधात काढलेला हा जगातला पहिला मोर्चा असेल. त्या बद्दल मोर्चा काढणाऱ्यांचा जांबोरी मैदानावर सत्कार केला पाहिजे” असं संजय राऊत म्हणाले.