यापुढे बाबासाहेबांचे नाव घेऊ नका, कुणी दिला माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांना सल्ला?
Tv9 Marathi April 25, 2026 07:45 PM

अमरावती – नेहमी वेगवेगळ्या वक्तव्याने चर्चेत असलेल्या धीरेंद्र शास्री यांची भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी भेट घेतल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.माजी सरन्यायाधीश गवई यांनी नुकतीच मध्यप्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील प्रसिद्ध बागेश्वर धामला कुटुंबासह भेट दिली आहे. या भेटीचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या प्रकरणात आता अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांनी अमरावतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत भूषण गवई यांच्यावर टीका केली आहे.

माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आता यापुढे बाबासाहेबांचे नाव घ्यायचं नाही असे अनिसचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांनी म्हटले आहे. भूषण गवई धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या पाया पडायला गेले होते याचा मला प्रचंड शॉक बसलाय असे श्याम मानव यांनी म्हटले आहे. भूषण गवई म्हणतात की मी आंबेडकरी विचारांचा आहे.आंबेडकरी विचारांचे मी दूध प्यायला आहे, पण तो माणूस जर धीरेंद्र शास्त्री महाराजांच्या पाया पडून आशीर्वाद घेत असेल तर आता तुम्ही यापुढे आंबेडकरांचे नाव कधीही घ्यायचं नाही तो अधिकार तुम्ही गमावलेला आहे असेही श्याम मानव यांनी म्हटले आहे. या पुढे तोंडातून पुन्हा आंबेडकरांचे नावच काढू नका, बाबासाहेबांचे नाव घेण्याचा अधिकार तुम्ही गमावलेला आहे अशीही टीका अनिसचे श्याम मानव यांनी केली आहे.

भूषण गवई हे रा.सू. गवई यांचे सुपुत्र आहेत. यापूर्वी विक्तू बाबांचा सत्कार दीक्षाभूमीवर घेतला त्यावेळेस मी विरोध केला होता असे श्याम मानव यांनी म्हटले आहे. धीरेंद्र शास्री यांनी अनेक वेळा वादग्रस्त वक्तव्य केली आहेत. कालच त्यांना नागपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज युद्ध करुन थकले आणि त्यांनी स्वामी समर्थ चरणी आपले राज्यपाट देऊ केला असे वक्तव्य धीरेंद्र शास्री यांनी केल्याने ते वादात सापडले आहेत. आता धीरेंद्र शास्री यांची माजी सरन्यायाधीशांनी सह परिवार भेट घेतल्याचे फोटो समाजमाध्यमात व्हायरल झाल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.