Eknath Shinde : शिवसेनेत प्रवेश करताना एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडूंना दिला महत्वाचा शब्द, 'मी कधीही तुमच्या..'
Tv9 Marathi April 30, 2026 05:45 PM

मागच्या अनेक दिवसांपासून जी चर्चा होती ती अखेर खरी ठरली आहे. प्रहार संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना शिवसेनेकडून विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली आहे.शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे आणि मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवसेनेकडून दोन जण विधान परिषदेवर जाणार आहेत. त्यात बच्चू कडू एक आहेत. विधान परिषदेत विजयासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 57 आमदार आहेत. त्यामुळे त्यांचे दोन उमेदवार निवडून येणं निश्चित आहे.”बच्चू कडू यांच्यासारखा कडवट कार्यकर्ता, सर्वसामान्यांचा नेता, दिव्यांगासाठी झटणारा, शेतमजूर, गोरगरीब, दलित, शोषित पीडित यांच्यासाठी आंदोलन करणारा, गोरगरीबांचा आंदोलक नेता म्हणून बच्चू कडू यांची ओळख आहे. त्यांनी आज त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला आहे” असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे बच्चू कडू यांच्या पक्ष प्रवेशाप्रसंगी म्हणाले.

“दिव्यांगांसाठी खऱ्या अर्थाने लढणारा, झटणारा नेता म्हणून बच्चू भाऊ तुमची ओळख आहे. तुम्ही आज शिवसेनेत असंख्य लोकांसह प्रवेश केला. त्यासाठी तुमचं मनापासून शिवसेनेत स्वागत करतो” असं एकनाथ शिंदे म्हणाले. “शिवसेना तुम्हाला नवीन नाही. तुम्ही मूळचे शिवसैनिक आहात. 25 वर्ष प्रहार सामाजिक संघटनेचं काम केलं. आज स्वगृही शिवसेनेत आलात. आपण आमदारकरीसाठी आलेला नाहीत हे स्पष्ट केलं. तुमची धेय्य, धोरणं,गरीबांना न्याय देण्याचा मुद्दा याला कुठेतरी सत्तेचं बळ लागतं” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

शिवसेनेला बच्चू कडू नवीन नाहीत

“आपण पाहिलं माझ्या अडीच वर्षाच्या कार्यकाळात, त्यावेळी अनेक निर्णय घेतलेत. आपण सोबत राहिला. बच्चू कडू यांना शिवसेना नवीन नाही, शिवसेनेला बच्चू कडू नवीन नाहीत. बाळासाहेबांनी, दिघेसाहेबांनी अन्यायाविरोधात लढायला शिकवलं. आपण दोघे त्याच विचारांचे आहोत. म्हणून विचारांची लढाई, विचाराने लढायची आहे” असं एकनाथ शिंदे म्हणाले.

शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे

“एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. मी एकदा कमिटमेंट केली की माझी कमिटमेंट कमिटमेंट असते. आज डायलॉग सांगत नाही. राजकारणात शब्द देणं आणि पाळणं महत्वाचं असतं. म्हणूनच या राज्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चांदा ते बांदा शिवसेना पोहोचवण्याचं काम एकनाथ शिंदे याने केलं. आपल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, याची ग्वाही देतो” असं एकनाथ शिंदे या प्रसंगी म्हणाले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.