Bachchu Kadu | बच्चू कडूंची शिवसेनेत घरवापसी; पदासाठी नाही, मुद्द्यांसाठी लढणार….बच्चू कडूंची पहिली प्रतिक्रिया काय?
Tv9 Marathi April 30, 2026 06:49 PM

प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आणि माजी मंत्री बच्चू कडू यांनी आज अधिकृतपणे शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आहे. काही कार्यकर्त्यांसह त्यांनी धनुष्यबाण चिन्ह स्वीकारत पुन्हा एकदा शिवसेनेत ‘घरवापसी’ केली आहे. एकेकाळी शिवसेनेत कार्यरत असलेले बच्चू कडू यांनी नंतर प्रहार सामाजिक संघटनेच्या माध्यमातून स्वतंत्र राजकीय वाटचाल केली होती. पक्षप्रवेशानंतर माध्यमांशी संवाद साधताना बच्चू कडू यांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. “शेतकरी, दिव्यांग आणि वंचित घटकांसाठी अधिक ताकदीने काम करण्यासाठी आम्ही शिवसेनेत प्रवेश केला आहे. सुरुवात शिवसेनेतून झाली आणि पुढील राजकीय प्रवासही शिंदे साहेबांच्या नेतृत्वातच राहील,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या. ग्रामगीतेच्या माध्यमातून शेतकरी आणि वंचित घटकांसाठी दिलेल्या संदेशाचा उल्लेख करत, त्यांच्या विचारांनुसार काम करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले की, “हा प्रवेश केवळ पदासाठी नसून मुद्द्यांच्या लढ्यासाठी आहे. शिंदे साहेबांचा सेवाभावी स्वभाव, शेतकरी आणि दिव्यांगांसाठी घेतलेले निर्णय, तसेच कर्जमाफीसारख्या उपक्रमांमुळे आम्ही प्रभावित झालो आहोत.” त्यांनी स्पष्ट केले की, पुढील काळात शेतकरी, कामगार, दिव्यांग, विधवा महिला आणि हमीभावाच्या प्रश्नांवर अधिक आक्रमकपणे लढा दिला जाईल. या घडामोडीमुळे राज्याच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून, विशेषतः विदर्भ आणि ग्रामीण भागात शिवसेनेच्या बळकटीसाठी हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.