तात्या लांडगे
सोलापूर : महाराष्ट्र दिनानिमित्त पोलिस सेवेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिस अधिकारी व अंमलदारांना दरवर्षी राज्याच्या पोलिस महासंचालकांकडून सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविले जाते. यंदा सोलापूर शहर पोलिस दल, ग्रामीण पोलिस, पोलिस प्रशिक्षण केंद्र व राज्य राखीव पोलिस बलातील तब्बल १५ अधिकारी व अंमलदारांना हे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र मिळणार आहे.
राज्याचे पोलिस महासंचालक सदानंद दाते यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या राज्यातील ८०० अधिकारी व अंमलदारांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहीर केले आहे. उद्या (शुक्रवारी) १ मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त सोलापूर शहर पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर पालकमंत्री जयकुमार यांच्या हस्ते या सर्व पोलिस अधिकारी व अंमलदारांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले जाणार आहे.
दरम्यान, पोलिस सेवेत दाखल झाल्यानंतर १० वर्षे उत्कृष्ट कामगिरी करणारे व जनसेवा करताना ज्यांना १०० पेक्षा जास्त बक्षिसे मिळालेली असतात, त्यांना पोलिस महासंचालकांकडून महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र दिले जाते. ज्यांची कोणत्याही प्रकारची चौकशी सुरु नाही, शिक्षा झालेली नाही, असे हे सगळे अधिकारी-अंमलदार असतात.
‘या’ अधिकारी-अंमलदारांचा होणार सन्मान
२०२५ या वर्षासाठी शहर पोलिसांकडील पोलिस निरीक्षक वैष्णवी पाटील, सहायक पोलिस निरीक्षक भारत चंदनशिव, जीवन निरगुडे, प्रविणकुमार हत्ते, ईरय्या स्वामी, पोलिस उपनिरीक्षक नागेश येणपे यांच्यासह अंमलदार दिपक जाधव, नितीन बागल, ज्योती यजमाने, महेश रोकडे यांना पोलिस महासंचालकांचे पदक जाहीर झाले आहे. तर सोलापूर ग्रामीण पोलिसांमधील सहायक पोलिस निरीक्षक मंजुळा धोत्रे यांनाही हे पदक मिळाले आहे. महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र मिळविणाऱ्या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. दुसरीकडे केगाव पोलिस प्रशिक्षण केंद्रातील पोलिस निरीक्षक संजय बोंबले, अंमलदार चंद्रकांत कुबसंगे, राज्य राखीव पोलिस बल क्र. दहा येथील सहायक पोलिस निरीक्षक नागेंद्र कट्टीमनी, यल्लप्पा कोळी यांनाही पोलिस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र जाहीर झाले आहे.