सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टम: देशभरातील लाखो अँड्रॉइड आणि आयओएस स्मार्टफोनधारकांना शनिवारी एक वेगळाच अनुभव आला. अचानक अनेकांच्या मोबाईलवर एक आपत्कालीन संदेश (Emergency Alert) आला आणि सायरनसारखा मोठा आवाज ऐकू आला. सार्वजनिक ठिकाणी एकाच वेळी अनेकांचे फोन वाजू लागल्याने सुरुवातीला नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण होते, मात्र काही वेळातच ही सरकारकडून केलेली एक ‘चाचणी’ असल्याचे स्पष्ट झाले. भारत सरकारने स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून ‘सेल ब्रॉडकास्ट अलर्ट सिस्टम’ची (Cell Broadcast Alert System) चाचणी सुरू केली आहे. ही यंत्रणा भविष्यात नैसर्गिक आपत्ती किंवा धोक्याच्या वेळी नागरिकांना सतर्क करण्यासाठी वापरली जाणार आहे.
ही एक हायटेक आपत्कालीन सावधानतेचा इशारा देणारी प्रणाली आहे. याच्या माध्यमातून सरकार कोणत्याही आपत्ती किंवा धोक्याच्या परिस्थितीत थेट मोबाईल फोनवर अलर्ट पाठवू शकते. याचा वापर भूकंप, सुनामी, वीज कोसळणे, पूर, गॅस लीक, रासायनिक धोके तसेच इतर मानवनिर्मित आपत्कालीन परिस्थितींमध्ये केला जाऊ शकतो.
ज्या वापरकर्त्यांच्या फोनवर हा मेसेज येईल, त्यांच्या मोबाईलवर जोरात सायरनसारखा आवाज येईल आणि स्क्रीनवर फ्लॅश मेसेज दिसेल. वापरकर्त्यांना तत्काळ आपत्कालीन इशारा मिळेल. ही प्रणाली विशेषतः प्रभावित भागातील लोकांपर्यंत तात्काळ माहिती पोहोचवण्यासाठी तयार करण्यात आली आहे.
सरकारच्या माहितीनुसार हे अलर्ट स्वदेशी Integrated Alert System ‘SACHET’ च्या माध्यमातून पाठवले जातील. हे सिस्टम C-DOT (Centre for Development of Telematics) ने विकसित केले आहे. हे कॉमन अलर्टिंग प्रोटोकॉल (CAP) वर आधारित असून, याची शिफारस इंटरनॅशनल टेलीकम्युनिकेशन युनियन (ITU) ने केली आहे.
सरकार देशभरातील मोबाईल नेटवर्क आणि अलर्ट सिस्टमची विश्वसनीयता तपासू इच्छित आहे. जेणेकरून प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी अलर्ट वेगाने आणि अचूकपणे लोकांपर्यंत पोहोचू शकतील. NDMA ने स्पष्ट केले आहे की हे संदेश केवळ चाचणीचा भाग आहेत आणि नागरिकांनी कोणतीही कारवाई करण्याची गरज नाही.
जर तुम्ही अँड्रॉइड वापरकर्ते असाल, तर पुढील स्टेप्स फॉलो करा.
– सर्वप्रथम सेटिंग्समध्ये जा.
– त्यानंतर ‘Safety & Emergency’ मध्ये जा.
– ‘Wireless Emergency Alerts’ मध्ये जाऊन ‘Test Alerts’ ऑन किंवा ऑफ करा.
मात्र, सरकारने स्पष्ट केले आहे की, भविष्यात प्रत्यक्ष आपत्तीच्या वेळी सर्व मोबाईल फोनवर विविध भारतीय भाषांमध्ये अलर्ट पाठवले जातील.
सरकारचा हा उपक्रम केवळ मेसेज पाठवण्यापुरता मर्यादित नसून, भारताच्या डिजिटल आपत्ती व्यवस्थापन नेटवर्कला अधिक मजबूत करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
आणखी वाचा
Emergency Alert on phone: अचानक सर्व मोबाईल फोनवर एकाचवेळी धडाधड इमर्जन्सी मेसेज, नेमकं कारण काय?
आणखी वाचा