तमिळनाडूचे भावी सीएम थलापती विजयच्या वडिलांनी सत्तेचा पहिला पत्ता खोलला! निवडणूक प्रचारातील तो शब्द पूर्ण करणार?
जयदीप मेढे May 04, 2026 07:43 PM

Tamilnadu Election Result 2026: 4 मे, 2026 हा दिवस तामिळनाडूच्या राजकारणात एका मोठ्या बदलाची नांदी ठरला. थलापती विजयने राज्यातील 'शक्तिशाली' पक्ष, डीएमके आणि एआयएडीएमके यांना पराभूत करून राजकारणात शानदार पदार्पण केले आहे. त्यांच्या टीव्हीके (तामिळगा वेटी कळघम) या पक्षाने बहुमत मिळवून आपल्या विरोधकांना पराभूत केले, ज्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणातील 50 वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक चमत्काराची आठवण झाली. ज्याप्रमाणे एम. जी. रामचंद्रन (एमजीआर) यांनी निवडणुकीच्या मैदानात आपल्या विरोधकांना पराभूत करून सामान्य जनतेचा आवाज बनून जननेतेपद मिळवले, त्याचप्रमाणे थलपथी विजयने तामिळनाडूच्या राजकीय पटलावर 'राजा' म्हणून स्थान मिळवले आहे.

बहुमतासाठी अवघ्या काही जागा दूर

दरम्यान, टीव्हीके 107 जागांवर आघाडी घेतल्याने बहुमतापासून 11 जागा दूर आहे. अशा स्थितीत विजय कोणाशी आघाडी करणार? याची उत्सुकता आहे. विजय यांच्या वडिलांनी सत्तेसाठी पहिला पत्ता खोलला आहे. विजय यांचे वडिल एस. चंद्रशेखर यांनी विजय काँग्रेसशी आघाडी करू शकतात, असं म्हटलं आहे. आतापर्यंत काँग्रेसने चुकीच्या पक्षासोबत आघाडी केली होती. आम्ही काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्यासाठी तयार आहोत, असे म्हटले होते. 

दुसरीकडे प्रचारात विजय यांनी प्रचारात खरी काँग्रेस आपल्यासोबत असून तमिळनाडू काँग्रेस डीएमकेच्या खिशात असल्याचे म्हटले होते. त्यामुळे आता विजय काँग्रेसशी जुळवून घेतात की, एआयडीएमकेशी युती करतात हा सुद्धा मुद्धा आहे. प्रादेशिक मुद्यांवर ठाम राहणार की सत्तेसाठी एनडीएच्या जवळ जाणार याची सुद्धा उत्सुकता आहे. 

मुख्यमंत्री बनून लोकांच्या हृदयावर राज्य करणार?

दरम्यान, एमजीआर आणि विजय यांच्या विजयांनी जनतेच्या मनात जुन्या आठवणी जागवल्या आहेत. जनता एमजीआर आणि थलपथी विजय यांच्या विजयांना एकमेकांशी जोडत आहे. पडद्यावर तारणहार म्हणून भूमिका साकारल्यानंतर अनेक वर्षांनी, एका नायकाने पुन्हा एकदा सत्तेत स्वतःला एक शक्तिशाली व्यक्ती म्हणून सिद्ध केले आहे. अनेक वर्षांपूर्वी, एमजीआर यांनीही चित्रपटसृष्टीतील आपल्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन तामिळनाडूच्या राजकारणात आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. त्यांनी 10 वर्षे मुख्यमंत्रीपद भूषवले. राज्याचे मुख्यमंत्री बनणारे एमजीआर हे पहिले अभिनेते होते. त्यांच्या नंतर अनेक अभिनेते राजकारणी आणि नंतर मुख्यमंत्री बनले, पण एमजीआर यांच्यासारखा प्रभाव फार कमी जणांनी पाडला. आता हे पाहणे बाकी आहे की, तामिळ सिनेमाच्या या बिनमुकुट राजाप्रमाणे विजय, मुख्यमंत्री बनून लोकांच्या हृदयावर राज्य करू शकेल का.

विजयची प्रतिमा एमजीआर यांच्याशी कशी जोडली जाते?

एमजीआर यांनी आपल्या चित्रपटांमध्ये वाईटाविरुद्ध लढणाऱ्या आणि गरिबांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या अभिनेत्याची प्रतिमा तयार केली होती. त्यांची 'गरिबांचा तारणहार' ही कॅमेऱ्यासमोरची प्रतिमा लोकांच्या हृदयाला भिडली. त्यांच्या लोकसेवेचा जनतेवर खोलवर परिणाम झाला. एम.जी.आर. यांच्या 1971 सालच्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'रिक्षावाला' या चित्रपटात त्यांनी एका गरीब रिक्षाचालकाची भूमिका साकारली होती. ते शोषितांचे तारणहार बनले. हा चित्रपट केवळ एक चित्रपट नव्हता, तर त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी एक व्यासपीठ होता. या चित्रपटाने त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा पाया घातला.

निवडणूक पदार्पणात अडथळा आणण्याचा पुरेपूर प्रयत्न

विजय यांनी तामिळनाडूच्या लोकांची मने जिंकण्यासाठी एम.जी.आर. यांच्याच रणनीतीचे अनुसरण केले. गेल्या 10 वर्षांतील या अभिनेत्याची चित्रपट कारकीर्द पाहता, त्यांनी 'कथी', 'सरकार', 'मेर्सल' आणि 'जिल्ला' यांसारख्या चित्रपटांमधून गरीब आणि शेतकऱ्यांचे तारणहार म्हणून आपली प्रतिमा प्रस्थापित केली. विरोधी पक्षांनी विजय यांच्या वैयक्तिक प्रतिमेवर हल्ला करून त्यांच्या निवडणूक पदार्पणात अडथळा आणण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यांचा शेवटचा चित्रपट, 'जना नायगन', प्रदर्शित होऊ दिला गेला नाही, पण विजय यांनी 'थलपती' बनून सर्व आव्हानांवर मात केली. विजय यांनी आपल्या स्वच्छ प्रतिमेच्या जोरावर डीएमके-एआयएडीएमकेच्या मतपेढीत आपले स्थान निर्माण केले आहे.

निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, त्यांचे विरोधक भाषेच्या मर्यादा ओलांडून विजय यांच्यावर चिखलफेक करताना दिसले. एम.जी.आर. यांच्याप्रमाणेच विजय यांनीही संयमित भाषेचा वापर करून स्वतःला वेगळे सिद्ध केले. एम.जी.आर. यांच्याप्रमाणेच विजय यांचा विभाजक राजकारणावर नव्हे, तर सर्वसमावेशक राजकारणावर विश्वास आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.