IPL 2026: प्रेक्षक नाहीत.. जाहिराती नाहीत.. टीआरपी रेटिंग तळाला.. क्रिकेटची क्रेझ कमी झाली का?
आयपीएल स्पर्धा ही जगातील श्रीमंत क्रिकेट लीग स्पर्धा आहे. या स्पर्धेत कोट्यवधी रूपयांची उधळण होत असते. त्यामुळे खेळाडूही या स्पर्धेत खेळण्याची संधी मिळावी यासाठी प्रयत्न करत असतात. पण आयपीएल स्पर्धेचं 19वं पर्व अर्थात 2026 स्पर्धेला प्रेक्षकांची हवी तशी साथ मिळताना दिसत नाही. यंदा स्पर्धेचा निम्मा टप्पा पार झाला आहे. पण ही स्पर्धा टीआरपी रेटिंगमध्ये खूपच मागे पडल्याचं दिसत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रेक्षसंख्येत घट झाल्याचं दिसत आहे. त्यामुळे क्रिकेट जाणकारानीही आश्चर्य व्यक्त केलं आहे. प्रेक्षकच नाही तर जाहिरातदारही हळूहळू या स्पर्धेतून काढता पाय घेत असल्याचं चित्र आहे. त्यामुळे बीसीसीआय आणि प्रसारकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे.
आयपीएल स्पर्धेची आकडेवारी काय सांगते?
बार्क इंडिया आणि टॅम स्पोर्ट्सने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, आयपीएल 2026 च्या टीआरपी रेटिंगमध्ये 18.8 टक्क्यांची घट नोंदवली गेली आहे. टीआरपी 4.57 वरून 3.71 पर्यंत खाली आला आहे.तर सरासरी प्रेक्षकसंख्येत 26 टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या वर्षी 12.40 कोटी लोकांपर्यंत पोहोचलेली ही स्पर्धा यंदा केवळ 11.36 कोटी लोकांपर्यंत मर्यादित राहिली आहे. हा आयपीएलच्या ब्रँड व्हॅल्यूला एक मोठा धक्का असल्याचं बोललं जात आहे.
आयपीएल स्पर्धेकडे पाठ फिरवण्याची कारण काय?
आयपीएल स्पर्धा यंदा कंटाळवाणी असल्याची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. यासाठी विविध कारणं सांगितली जात आहे. त्यापैकी काही कारण अधोरेखित केली आहे.
-
स्पर्धा आणि सामन्यांचं दीर्घ स्वरूप: आयपीएल 2026 स्पर्धा ही दीर्घकाळ चालत असल्याने सुरूवातीच्या सामन्यात तसा काही रस नसतो. दररोज होणारे सामने कंटाळवाणे होत असल्याची चर्चा आहे. मध्यात प्लेऑफची रंगत वाढली की सामन्यांना खऱ्या अर्थाने महत्त्व मिळतं. यातही काही सामने 4 तासांची मर्यादा ओलांडत आहेत. त्यामुळे इतक्या वेळ एकाच जागेवर खिळून राहणं कंटाळवाणं वाटतं.
-
सपाट खेळपट्ट्या आणि इम्पॅक्ट प्लेयर: सपाट खेळपट्ट्या आणि इम्पॅक्ट प्लेयर नियमामुळे गोलंदाजीची काही किंमतच उरली नाही. गोलंदाजांनी सामना काढला तरी इम्पॅक्ट प्लेयर येऊन सामना खेचून नेतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तुलनेत हे नियम प्रेक्षकांना फार आवडले नसल्याचं दिसत आहे.
-
फँटसी एप्सवर बंदी: देशात फँटरी गेमिंग एप्सवर बंदी घातली आहे. त्यामुळे एका मोठ्या वर्गाने या सामन्यांकडे पाठ फिरवली आहे. या एप्समुळे काही वर्ग पैशांची पैज लावण्यासाठी उत्साही असायचा. पण त्याला वेसण घातल्याने खासकरून तरूणांमध्ये स्पर्धेची आवड कमी झाली आहे. इतकंच काय तर चर्चाही होत नाही.
-
प्रेक्षकांच्या सवयी: आयपीएल स्पर्धेत दहा संघ खेळत आहेत. प्रत्येक फ्रेंचायझीचा एक प्रेक्षक वर्ग आहे. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स आणि आरसीबी या संघांचा मोठा चाहता वर्ग आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांनी पाचवेळा जेतेपद मिळवलं आहे. पण त्यांची नाजूक असल्याने प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. इतकंच काय तर काही प्रेक्षक फक्त आपल्या आवडत्या संघाचे सामने पाहतात.