आयपीएल 2026 स्पर्धेत पंजाब किंग्सने जबरदस्त कामगिरी केली आहे. आतापर्यंत खेळलेल्या 9 पैकी 6 सामन्यात विजय मिळवला आहे. तर दोन सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. एक सामना पावसामुळे रद्द झाल्याने फुकटचा 1 गुण मिळाला. त्यामुळे गुणतालिकेत 13 आणि नेट रनरेट +0.855 असून पहिल्या स्थानावर आहे. पंजाबचा संघ प्लेऑफमध्ये जागा मिळवण्याचा वेशीवर आहे. सलग सात सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं नव्हतं. पण आठव्या आणि नवव्या सामन्यात पराभव झाल्याने प्लेऑफमध्ये जागा मिळवण्याचं स्वप्न लांबलं आहे. राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्सने पराभवाची धूळ चारली. त्यामुळे पुढच्या काही सामन्यात प्लेऑफची वाट पाहावी लागणार आहे. गुजरात टायटन्सकडून झालेल्या पराभवानंतर पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने आपलं म्हणणं मांडलं.
आयपीएल स्पर्धेतील गुजरातविरुद्धच्या सामन्यानंतर पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘आम्ही अजूनही गुणतालिकेत अव्वल स्थानी आहोत आणि तेच महत्त्वाचे आहे. आम्ही या सामन्यातून सकारात्मक गोष्टी घेऊ. आयपीएलमध्ये पुढे जाताना अशा खेळपट्ट्यांवर खेळणे हे एक मोठे आव्हान आहे, कारण त्यामुळे गोलंदाजांचा आत्मविश्वासही वाढतो. विशेषतः मागच्या सामन्यात 50-60 धावा दिल्यानंतर इथे येऊन उत्कृष्ट गोलंदाजी केल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढू शकतो. आम्हाला जिंकायचे होते, पण जमले नाही.’ प्लेऑफमध्ये जागाा पक्की करायची असल्यास उर्वरित सहा पैकी 2 सामन्यात पंजाब किंग्सला काहीही करून विजय मिळवावा लागेल. अन्यथा गणित किचकट होत जाईल. त्यामुळे सुरूवातीला विजय मिळवणं भाग आहे. कारण प्लेऑफची शर्यत पुढे आणखी तीव्र होणार यात काही शंका नाही.
श्रेयस अय्यरने पुढे सांगितलं की, एसआरएचविरुद्ध खेळण्याच्या संधीसाठी उत्सुक आहोत, ते दोन गुण मिळवायचे आहेत. सरावात खूप मेहनत घेतली आहे. मुले खूप कष्ट घेत आहेत. तुम्ही मैदानाबाहेर काय करता, हेच महत्त्वाचे आहे. जर चारित्र्य चांगले असेल आणि दृष्टिकोन योग्य असेल, तर तुम्हाला अखेरीस यश मिळतेच. फक्त आपल्या मूलभूत गोष्टी आणि दिनचर्यांना चिकटून राहायचे आहे आणि खूप पुढेचा विचार करायचा नाही.