गेल्या काही काळापासून महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आपण बाजारात गेलो तर खिसा रिकामा झाला तरी पिशवी भरत नाही. गॅस, भाजीपाला, डाळी, तेल सर्वांचेच दर गगनाला भिडले आहेत. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की आजपासून सुमारे साडेसात दशकांपूर्वी, म्हणजे 1950 च्या काळात महागाई किती होती? आपल्या आजोबा पंजोबाच्या काळात खाण्यापिण्याच्या वस्तूंचे दर किती होते? तुम्ही जर आकडा वाचला तर तुम्हालाही विश्वास बसणार नाही. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
सध्याच्या काळात सामान्य माणसासाठी जेवण तयार करणेही महागले आहे. बाजारात गव्हाचे पीठ 40 ते 45 रुपये किलो, तूर डाळ 150 ते 180 रुपये किलो आणि मोहरीचे तेल 140 ते 160 रुपये लिटर दराने मिळते. तर शुद्ध देशी तूप 600 ते 700 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहे. भाजीपाला आणि मसाल्यांच्या किमतीही वाढत आहेत. या महागाईमुळे मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांचे बजेट कोलमडले आहे. मात्र 75 वर्षांपूर्वी ही परिस्थिती वेगळी होती.
1950 साली भारत नुकताच स्वतंत्र झाला होता आणि अर्थव्यवस्था वेगळी होती. त्या काळात रुपयाची किंमत जास्त होती आणि 1 रुपया म्हणजे 16 आणे असे होते. त्या काळी महागाई जवळजवळ नव्हतीच. गव्हाचे पीठ 10 ते 30 पैसे प्रति किलो होते. डाळी 20 ते 25 पैसे प्रति किलो होत्या. तेल 25 ते 30 पैसे प्रति लिटर, शुद्ध देशी तूप 2 ते 5 रुपये प्रति किलोने मिळते होते. तांदूळ सुमारे 12 पैसे प्रति किलो, साखर सुमारे 40 पैसे प्रति किलो, दूध सुमारे 12 पैसे प्रति लिटर, सोने 88 ते 90 रुपये तोळा होते. महिन्याचे सामान 10 ते 12 रुपयांमध्ये मिळत असे.
1950 च्या काळात स्वयंपाकघर खूप साधे आणि नैसर्गिक होते. गॅसऐवजी लोक मातीच्या चुलीवर स्वयंपाक करायचे. इंधनासाठी लाकूड, गोवऱ्या आणि कोळसा वापरला जायचा. भांडी पितळ, तांबे, कांस्य किंवा मातीची असायची. हळूहळू शिजवलेल्या अन्नामुळे चव आणि पौष्टिकता टिकून राहायची. तसेच फ्रिज नसल्यामुळे थंड पाण्यासाठी माठ वापरले जायचे.