जगभरात पगारवाढीत भारत आघाडीवर, यावर्षी किती वाढणार तुमचा पगार? जाणून घ्या सविस्तर माहिती
एबीपी माझा वेब टीम May 04, 2026 10:43 PM

India Salary Growth :  जागतिक वेतनवाढीच्या आलेखात भारत आघाडीवर (India Salary Growth) आहे. 2026 पर्यंत वेतनवाढ सरासरी 9.1 पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. जी 2025 मधील 8.9 टक्के पेक्षा किंचित जास्त आहे. एऑनच्या 'सॅलरी ग्रोथ अँड टर्नओव्हर सर्व्हे 2025-26 नुसार, ही वाढ अमेरिका 4.3 टक्के आणि युके (4.1 टक्के) सारख्या विकसित देशांपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे.

अहवालात म्हटले आहे की, वाढलेल्या देशांतर्गत मागणीमुळे रिअल इस्टेट, पायाभूत सुविधा आणि वित्तीय सेवा (एनबीएफसी) यांसारख्या क्षेत्रांमध्ये सर्वाधिक वेतनवाढ होत आहे. कर्मचारी गळतीचा दर 16.2 टक्केपर्यंत कमी झाला आहे, जो गेल्या वर्षीच्या तुलनेत घटलेला आहे.

भारतात लक्षणीय वेतनवाढ

तज्ञांच्या मते, कनिष्ठ कर्मचाऱ्यांना सर्वाधिक सरासरी 9.6 टक्के वेतनवाढ मिळत आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की, कंपन्या चांगल्या कर्मचाऱ्यांना, विशेषतः कनिष्ठ आणि नवीन कर्मचाऱ्यांना, नोकरी सोडून जाण्यापासून रोखण्यासाठी त्यांना टिकवून ठेवण्यावर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. एऑनचे पार्टनर आणि रिवॉर्ड्स कन्सल्टिंग लीडर (टॅलेंट सोल्युशन्स, इंडिया) रुपंक चौधरी म्हणाले की, सध्या सुरू असलेल्या जागतिक अस्थिरतेनंतरही भारताची देशांतर्गत अर्थव्यवस्था खूप मजबूत आहे, त्यामुळे भारतातील नोकऱ्यांचे मूल्यांकन इतर मोठ्या देशांपेक्षा खूप जास्त आहे.

कोणत्या क्षेत्रांमध्ये किती वाढ?

ऑटोमोबाइल आणि वाहन निर्मिती क्षेत्रात सर्वाधिक वाढ दिसून आली आहे, जिथे 2025 मध्ये पगारात 9.8 टक्के पगारवाढ होऊन ती 2026 मध्ये 9.9 टक्के पर्यंत पोहोचेल. त्यानंतर, बँकिंग क्षेत्रात पगारात सुमारे 8.4 टक्के वाढ झाली असून आता ती 8.8 टक्केपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. रसायन आणि अभियांत्रिकी क्षेत्रातही सुमारे 8.5 टक्केवाढ झाली असून आता त्यात 8.8 टक्केवाढ दिसून येत आहे. टेक कन्सल्टिंग क्षेत्रात परिस्थिती वेगळी आहे, जिथे आयटी सेवांमध्ये पगाराच्या वाढीचा दर सर्वात कमी, सुमारे 6.8 टक्के आहे.

कर्मचारी गळतीचा दर आणि तज्ञांचे मत

सर्वेक्षणानुसार, एकूण कर्मचारी गळतीचा दर सातत्याने कमी होत आहे. 2025 मध्ये तो 16.2 टक्केपर्यंत कमी झाला असून, तो कोविड-19 पूर्वीच्या पातळीच्या जवळ पोहोचला आहे. हा दर 2024 मध्ये 17.7 टक्के आणि 2023 मध्ये 18.7 टक्के होता. तज्ज्ञांच्या मते, कंपन्या आता केवळ पगारावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी कौशल्ये, कामगिरी आणि करिअरमधील प्रगतीवर अधिक लक्ष केंद्रित करत आहेत. त्यामुळे, वारंवार नोकऱ्या बदलण्याऐवजी, कर्मचारी आता अशा नोकऱ्या शोधत आहेत, ज्यात चांगली पगारवाढ, त्यांच्या कामाची स्पष्ट समज आणि त्यांच्या चांगल्या कामासाठी योग्य मान्यता मिळेल.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.