राज्यात काँग्रेस स्वबळावर बहुमतासमीप : मुख्यमंत्रिपदासाठी अनेक जण शर्यतीत
140 सदस्यीय केरलम विधानसभेची निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे मानले जात होते, परंतु मतदारांनी यावेळी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युडीएफच्या बाजूने स्पष्ट कौल दिला आहे. युडीएफने राज्यातील 140 पैकी 100 जागा मिळवत डाव्या आघाडीचा मोठा पराभव केला आहे. तर राज्यात काँग्रेस स्वबळावर बहुमत मिळवू शकेल अशी स्थिती आहे. तर भाजपने राज्यात 3 जागा जिंकत पुन्हा विधानसभेत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफला या निवडणुकीत मागील वेळेच्या तुलनेत 61 जागा गमावत 35 वर समाधान मानावे लागले आहे.
केरलम हा डाव्या विचारसरणीचा अखेरचा अन् मजबूत बालेकिल्ला होता. परंतु या निवडण्gकीत हा बालेकिल्ला ढासळला आहे. सत्तापरिवर्तनाच्या लाटेवर स्वार काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफने राज्याच्या सत्तेत पुनरागमन केले आहे. यूडीएफच्या वतीने प्रचाराचे नेतृत्व काँग्रेस महासचिव के.सी. वेणुगोपाल, विरोधी पक्षनेते व्ही.एन. सतीशन आणि रमेश चेन्निथला यांनी केले होते. यामुळे मुख्यमंत्री पदासाठी या तिन्ही नेत्यांमध्ये चुरस दिसून येणार आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय अशी ओळख असलेले रमेश चेन्निथला हे हरिपाद मतदारसंघातून विजयी झाले आहेत. यामुळे ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत सामील झाले आहेत. तर व्ही.एन. सतीशन हे वर्तमान विरोधी पक्षनेते असल्याने मुख्यमंत्रिपदासाठी त्यांचे नाव सर्वाधिक आघाडीवर आहे. तर दुसरीकडे के.सी. वेणुगोपाल यांची महत्त्वाकांक्षा पाहता ते देखील मुख्यमंत्रिपदासाठी इच्छुक असल्याचे मानले जाते. वेणुगोपाल यांचा सल्ला घेतल्याशिवाय राहुल गांधी हे कुठलाच निर्णय घेत नसल्याचे मानले जाते.
मुख्यमंत्री विजयनच पराभूत
केरलमचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन हे धर्मदम विधानसभा मतदारसंघात पराभूत झाले आहेत. काँग्रेस उमेदवार व्ही.पी. अब्दुल रशीद यांनी त्यांना पराभूत पेल आहे. मुख्यमंत्री विजयन हेच पराभूत झाल्याने डाव्या आघाडीचा आत्मविश्वास खालावणार हे निश्चित. यामुळे पुढील काळात केरळमध्ये स्वत:चा राजकीय प्रभाव टिकविणे डाव्या पक्षांसाठी अवघड ठरणार आहे. तसेच भाजपकडून होणारे जोरदार प्रयत्न पाहता भाजप डाव्या पक्षांची जागा घेऊ पाहत असल्याचे मानले जातेय.
त्रिशूर
या मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार राजन पल्लन यांनी एलडीएफ उमेदवार अलंकोड लीलाकृष्णन यांना 26,083 मतांनी पराभूत करत मोठा विजय मिळविला. या मतदारसंघात भाजप उमेदवार पद्मजा वेणुगोपाल तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या आहेत.
कोल्लम मतदारसंघ
काँग्रेस नेते बिंदू कृष्णा यंनी कोल्लम मतदारसंघात माकप उमेदवार एस. जयमोहन यांना 16,830 मतांनी पराभूत केले, तर भाजप उमेदवार प्रताप कुमार या मतदारसंघात तिसऱ्या स्थानी राहिले आहेत.
मुस्लीम लीगची मोठी आघाडी
काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफचा मोठा घटक इंडियन युनियन मुस्लीम लीग 23 जागांवर यशस्वी ठरला आहे. मंजेश्वरम, कासरगोड, कुट्टियाडी, पेरंबरा, कोझिकोड दक्षिण, कुन्नामंगलम, कोडुवल्ली, तिरुवबंदी, कोंडोट्टी, एर्नाड, मंजेरी, पेरिथलमन्ना, मांकडा, मलप्पुरम, वेंगारा, विल्लकुन्नू, तिरुरंगाडी, तनूर, तिरुर, कोट्टक्कल, मन्नारक्कड, गुरूवायूर, कलामासेरी या मतदारसंघात मुस्लीम लीग यशस्वी ठरला आहे.
डाव्यांच्या बालेकिल्ल्यात भाजपची मुसंडी
केरलममधील डाव्यांचा बालेकिल्ला मानण्यात येणाऱ्या चथन्नूर मतदारसंघात भाजप उमेदवार बीबी गोपकुमार यांनी विजय मिळविला आहे. डाव्या पक्षांचे उमेदवार आर. राजेंद्रन यांना गोपकुमार यांनी 4 हजार मतांनी पराभूत पेले आहे. तर काँग्रेस उमेदवार सुरज रवि हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
केरलम मुख्यमंत्रिपदाचे संभाव्य चेहरे
केरलमच्या सत्तेवर दहा वर्षांपासून असलेल्या डाव्या आघाडीला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटने प्रचंड बहुमत मिळविले आहे. काँग्रेसच स्वबळावर बहुमतासमीप पोहोचले आहे. परंतु हा विजय जितका स्पष्ट तितकेच त्यानंतरचे चित्र जटिल ठरणार आहे, कारण सरकार स्थापन होण्यापूर्वीच काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रिपदावरून चढाओढ तीव्र झाली आहे.
केरलम काँग्रेसमध्ये उघड वक्तव्यं होत नसली तरीही आतून लॉबिंग पूर्ण जोरात सुरू आहे. 9 एप्रिल रोजी मतदान झाल्यापासून प्रत्येक गटाने स्वत:च्या पद्धतीने शक्तिप्रदर्शन सुरू केले होते. कुणी संभाव्य आमदारांची मोजणी करत होता, तर कुणी दिल्ली दरबारात स्वत:ची पकड मजबूत करत राहिला. या पूर्ण कवायतीत जातीय समीकरण, क्षेत्रीय संतुलन आणि संघटनात्मक पकड यासारखे घटकही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. याचमुळे मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न आता केवळ एक नावाचा नाही तर पूर्ण राजकीय गणित ठरला आहे.
व्ही.डी. सतीशन : तळागाळाशी संपर्क
मुख्यमंत्रिपदासाठी व्ही.डी. सतीशन सध्या सर्वात मजबूत दावेदार मानले जात आहेत. विरोधी पक्षनेता म्हणून त्यांनी डाव्या सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका बजावली आणि स्वत:ला प्रभावी चेहरा सिद्ध केले. त्यांच्याकडे ग्राउंड कनेशक्सन आहे आणि आमदारांचा एक वर्ग त्यांच्यासोबत उभा आहे. परंतु काँग्रेसच्या राजकारणात केवळ तळागाळातील शक्ती पुरेशी नसते, तर येथे पक्षश्रेष्ठींची मंजुरी सर्वात मोठा घटक ठरतो.
कसे. वेणुगोपाल: दिल्ली कनेक्शन
के.सी. वेणुगोपाल यांची पक्षात मजबूत लॉबिंग सुरू आहे. ते राहुल गांधींचे अत्यंत घनिष्ठ सहकारी आहेत. केवळ केरलम नव्हे तर राष्ट्रीय राजकारणातही ते काँग्रेसचा महत्त्वाचा स्तंभ असल्याचे मानले जाते. परंतु मागील काही काळापासून ते केरलमच्या राजकारणात अचानक सक्रीय झाले. राज्यातील काँग्रेस नेते के. सुधाकरन यांनी वेणुगोपाल यांना राज्यातील सर्वोच्च पद द्यावे अशी मागणी केली आहे. पक्षश्रेष्ठींशी जवळीक आणि संघटनेवर पकड असली तरीही वेणुगोपाल यांना राज्य स्तरावरील स्वीकारार्हतेच्या प्रश्नाला सामोरे जावे लागतेय.
रमेश चेन्निथला : अनुभवाचा दावा
रमेश चेन्निथला यांच्याकडे मोठा राजकीय अनुभव आहे, ते दीर्घकाळापासून केरलम काँग्रेसच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिले आहेत. चेन्निथला यांचे नाव मजबूत असले तरीही त्यांच्याबद्दल पक्षाच्या गोटात उत्साह कमी दिसतो. पण विविध गटांमध्ये सहमती न झाल्यास ते एक सर्व गटांना सहमत असलेला चेहरा म्हणून समोर येऊ शकतात.